तासगाव : तालुक्यातील पाणी योजना सुरु कराव्यात, दुष्काळाच्या सवलतीही मिळाव्यात, यासह अन्य मागण्यांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी केले. तासगाव बाजार समितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते.तासगाव - कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणी पातळी खालावली आहे. चारा, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील विसापूर-पणुदी, आरफळ, म्हैसाळ, ताकारी या पाणी योजना बंद अवस्थेत आहेत. टंचाईतून वीज बिल भरुन या योजना त्वरित सुरु कराव्यात, तरच पाणीप्रश्न सुटू शकणार आहे. विसापूर-पुणदी योजनेसाठी आर. आर. पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र पाणीप्रश्नाकडे सध्याच्या शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळाच्या सवलती दोन्ही तालुक्यात त्वरित द्या, चारा छावण्या सुरु करा, वीज बिल, कर माफ करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पिकांची नुकसान भरपाई द्यावी, सौरऊर्जेवरील पाणी पंप अनुदानावर मिळावेत, तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, यांसह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले. (वार्ताहर)तालुक्यात एकापाठोपाठ एक अशा पध्दतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीही टाळाटाळ होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यांची साधी विचारपूस देखील होत नाही. तालुक्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंंतेचा विषय आहे. हे थांबविण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार आहे. - अविनाश पाटील, सभापती, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव.
दुष्काळाविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार
By admin | Updated: November 24, 2015 00:24 IST