कवठेमहांकाळ : साहेब, आमच्याकडे लक्ष द्या, कवठेमहांकाळ तालुक्यातील जनता फक्त मतदान मशीनवरची बटण दाबण्यासाठी आहे काय. विकासकामात आम्ही दुर्लक्षित आहोत, अशी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना नरसिंहगावच्या नागरिकांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर थांबवले व व्यथा सांगत विविध विकासकामांची मागणी केली.
रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जत दौरा केला. यावेळी ते रत्नागिरी- नागपूर महामार्गावरून जात होते. ही माहिती नरसिंहगावच्या नागरिकांना मिळाली. त्यांनी माजी सभापती दत्ताजीराव पाटील यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा नरसिंहगाव येथे थांबवला व आपल्या व्यथा मांडल्या.
तासगाव तालुक्यातील वजरचौंडे बंधारा ते कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव तलाव जोडणारा म्हैसाळ योजनेचा कालवा तातडीने दुरुस्त करावा. नरसिंहगाव येथे आरोग्य केंद्र उभारावे. नरसिंहगाव येथे होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलसाठी मदत करावी आदी मागण्या सरपंच दिगंबर गुरव, उपसरपंच अरुणराजे भोसले, प्रशांत कदम, एल. पी. कदम, तुकाराम कदम यांनी केल्या. यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांच्या मागण्या करण्याचा शब्द दिला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील,माजी सभापती दत्ताजीराव पाटील यांच्या साक्षीने शब्द दिला.