मिरज : मिरजेतील अमननगर येथील लियाकत शेख (वय ४५) या रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारी झाल्याने लियाकत शेख यांनी आर्थिक विवंचनेतून गुरुवारी दुपारी तीन वाजता घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा होती.
लॉकडाऊनमुळे गेले चार महिने व्यवसायात मंदी असल्याने लियाकत आर्थिक अडचणीत होते. उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने ते हवालदिल होते. त्यातच फायनान्स कंपनीचे त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते वसुलीचा तगादा त्यांना सुरू होता. कर्जाच्या विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. लियाकत शेख मिरज बसस्थानक परिसरात सुमारे २५ वर्षे रिक्षा व्यवसाय करीत होते. बसस्थानक परिसरात वीस दिवसांपूर्वी लियाकत शेख यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांच्याजवळील पाचशे रुपये लुटण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेतर्फे लियाकत शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याबाबत शहर पोलिसांत नोंद आहे.