लोकमत न्यूज नेटवर्क
जत : एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी, पुढचे चार महिने विवाह मुहूर्तच नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. व्यावसायिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
लग्नसमारंभासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र या काळात लग्नाचे मुहूर्तच नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. ऑगस्टमध्ये लग्न समारंभाचे मुहूर्त नाहीत. मात्र २६, २७, ३० आणि ३१ यासोबतच सप्टेंबर महिन्यातील १,८, १६ व १७ या तारखेचे गौण मुहूर्त आहेत. पुढचे चार महिने लग्नासाठी मुहूर्त नसल्याने अनेक जणांनी लग्न लांबणीवर टाकले आहे. लग्न समारंभ बंद असल्याने यावर चालणारे अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत. केटरर्स व्यवसाय तर फक्त नावाला उरला आहे. गेल्यावर्षीपासून मोठ्या ऑर्डर मिळत नसल्याने अनेक कामगार कामावरून काढावे लागले आहेत. मोठ्या समारंभासाठी लागणारी साधनसामग्री धूळ खात पडून आहे.
चौकट
पहिले पाढे पंचावन्न
कोरोनाचे रुग्ण जास्त होते आणि म्हणून निर्बंध असल्याने लग्नसमारंभ मोजक्या लोकांत उरकावा लागायचा. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आलीच तर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, अशी स्थिती होईल, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.