जिरवाजिरवी... अशी ही जिरवाजिरवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:50 PM2019-05-24T23:50:12+5:302019-05-24T23:50:19+5:30

श्रीनिवास नागे राज्यभरात चर्चेला आलेला ‘वंचित फॅक्टर’ सांगलीकरांना पुरेपूर अनुभवायला मिळाला. संजयकाकांनी लोकसभेची मॅच मारताना पाच लाखावर मतं ‘कमळा’च्या ...

Jirvajirvi ... Such is Jirvajirvi | जिरवाजिरवी... अशी ही जिरवाजिरवी

जिरवाजिरवी... अशी ही जिरवाजिरवी

Next

श्रीनिवास नागे
राज्यभरात चर्चेला आलेला ‘वंचित फॅक्टर’ सांगलीकरांना पुरेपूर अनुभवायला मिळाला. संजयकाकांनी लोकसभेची मॅच मारताना पाच लाखावर मतं ‘कमळा’च्या पारड्यात टाकून घेतली. विशाल पाटलांच्या ‘बॅट’वर तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांची उधळण झाली, तर गोपीचंदांच्या ‘कप-बशी’नं तीन लाख मतं गट्टंम् केली.
काकांविरोधात सहा महिने रान पेटवणाऱ्या गोपीचंदांमुळं काकांना फटका बसणार, असा प्राथमिक अंदाज सुरुवातीला सगळेच वर्तवत होते. जिरवाजिरवीच्या या खेळात काकांची मागच्यावेळची साडेसहा लाखांवरची मतं यंदा दीड लाखांनी कमी झाली. ती कमी होण्यात गोपीचंदांनी वाटा उचलला, हे तर निकालानंतर स्पष्टच झालं. पण वंचित बहुजन आघाडीकडून लढणाºया गोपीचंदांच्या दीड लाखांवरच्या उरलेल्या मतांनी महाआघाडीतल्या ‘स्वाभिमानी’कडून लढणाºया विशाल पाटलांची विकेट घेतली, हेही अधोरेखित झालं. अर्थात या विकेटचं सरसकट खापर ‘वंचित’वर फोडून चालणार नाही, तर ही मतं ‘वंचित’कडं वळली कशी, वळवली कुणी, आपल्याला का नाकारलं, काकांविरोधातील वातावरणाचा फायदा उठवण्यात आपण कुठं कमी पडलो, यावर महाआघाडीचे प्रस्थापित चिंतन करतील का, हाच खरा प्रश्न आहे. (असं चिंतन करण्यासाठी काकांकडूनच धडे घ्यावेत. उगाच नाही बाबा-महाराजांचे आशीर्वाद घेण्यात काका वेळ घालवत!)
सांगलीला जिरवाजिरवीचा खेळ नवा नाही. सिंचन योजनांचं पाणी जिरवण्याऐवजी एकमेकांची कशी जिरवायची यातच इथल्या नेत्यांची शक्ती गहाण पडलेली! सुरुवातीच्या टप्प्यात संजयकाका एकतर्फी मॅच मारतील, असं वाटत होतं. तेव्हा काँग्रेसच्या टीमनं रडीचा डाव सुरू केला. काकांविरोधात पीचवर उतरायला कुणीच तयार नव्हतं. (काकांच्या बाऊन्सरपेक्षा आपल्याच टीमकडून रनआऊट होण्याची भीती दाटलेली!) त्यातच राष्टÑवादीनं पराभवाचा बागुलबुवा उभा केलेला! मग काँग्रेस-राष्टÑवादीच्या महाआघाडीनं राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’लाच पॅड बांधायला लावलं. काही झालं तरी वसंतदादा घराण्यातलं कुणीच बॅटिंगला जाणार नाही, याची काळजी घेणाऱ्यांनी जणू संजयकाकांना ‘बाय’ द्यायचंच ठरवलं होतं. त्यामुळं गोपीचंद पडळकरांकडंच ‘स्वाभिमानी’ची बॅट देण्यासाठी कºहाडात बैठका झाल्या. मात्र बॅटिंगची संधी मिळालेल्या शेट्टींनी विशाल पाटील यांनाच पीचवर उतरवलं.
तिकडं संजयकाकांची जिरवण्यासाठी टपलेल्या भाजपेयींचे मनसुबेही तडीस जात नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळं काकांचं तिकीट कापण्यापासून गोपीचंदांना रसद पुरवण्यापर्यंतचे डाव उधळले गेले. फडणवीसांनी काकांच्याच हातात बॉल सोपवला. शिवाय फिल्डिंग लावण्याची जबाबदारी कोल्हापूरकर दादांकडं दिली. त्यामागं मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून खेळणाºया दादांना फिल्डिंगमध्येच गारद करण्याची खेळी होती. शिवाय टीममधल्या सगळ्या आमदारांना-नेत्यांना फिल्डिंग टाईट करण्याचा हुकूम सोडला. काकांना बॉलिंग देण्यानं नाराज झालेल्या दादांनी नाईलाजानं जमवाजमव केली. आपल्या बॉलवर काहीजण मुद्दाम कॅच सोडणार, हे माहीत असलेल्या काकांनी हळूच स्वत:चीही फिल्डिंग लावली. (तशी त्यांची टीम वर्षभरापासूनच तयार होती.)
विशाल पाटलांनी बॅटिंगला आल्याआल्याच काकांच्या टीमविरोधात चौकार-षटकार हाणले. काँग्रेसची पारंपरिक साडेतीन लाखावर असलेली मतं, राजू शेट्टींमुळं मिळणारी लाखभर मतं, स्वत:च्या मनगटावर मिळणारी लाखभर आणि राष्टÑवादीनं पुरवलेली पाच-पन्नास हजार मतं यावर मॅच जिंकू, असा ढोबळ अंदाज त्यांनी बांधलेला. राजकारणात दोन अधिक दोन म्हणजे चार हे सूत्र कधीच खरं ठरत नाही, शिवाय दादा घराण्याला पाण्यात बघणारे पाठीत खंजीर खुपसण्यात माहीर आहेत, हे माहीत असतानाही त्यांनी स्वत:च्या बॅटिंगवर सट्टा लावला होता.
संजयकाकांकडं बॉलिंगमधली हुकमी अस्त्रं होती. सिंचन योजना-महामार्गांसाठी आणलेल्या निधीचा यॉर्कर, जनसंपर्कातील सातत्याची गुगली, काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांशी जवळीकीचा आऊटस्विंग, विरोधकांच्या दांड्या उडवणाºया कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीचा इनस्विंग अशा चेंडूंवर महाआघाडीला खेळताच आलं नाही. त्यात काकांचा सराव दीड-दोन वर्षं चाललेला! विशाल यांची दांडी गूल करण्यासाठी तेवढं पुरेसं होतं. विशाल यांच्याकडं अनुभवी टीमची कमी होती. पतंगराव, आर. आर. आबा, मदनभाऊ नव्हते. हाच मोका साधला गेला. सांगली-मिरज हे विशाल यांचं होमपिच. इथं काँग्रेस-राष्टÑवादीची तगडी टीम. चाणाक्ष नगरसेवकांचा भरणा. तरीही विशाल पाटील या दोन्ही मतदारसंघात ३८ हजार मतांनी मागं पडले.
खानापूर-आटपाडीत काका आणि गोपीचंद बरोबरीनं चालले. तिथं तालुक्याच्या अस्मितेच्या मुद्द्यावर गोपीचंदांना ७८ हजार मतं दिली गेली, पण भाजप-राष्टÑवादीचा गड असलेल्या तासगाव-कवठ्यातही गोपीचंद दुसºया क्रमांकावर राहिले. जतमध्ये काँग्रेस-राष्टÑवादीची एकत्रित ताकद भाजपपेक्षा जास्त असताना विशाल पाटील तिसºया क्रमांकावर फेकले गेले. काकांना ७८ हजार, तर विशाल यांना ३१ हजार मतं पडली. तिथं गोपीचंदांनी ५३ हजार मतं मिळवली! ही कुणाची ‘गेम’..?
पलूस-कडेगावचं काय?
पाच मतदारसंघात पुढं असणारं ‘कमळ’ पलूस-कडेगावमध्ये ‘बॅट’पेक्षा पाच हजारांनी मागं पडलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष याच मतदारसंघातले. शिवाय काकांची स्वतंत्र टीम आहे इथं. तरीही हे घडलं. अर्थात इथं काँग्रेसचा आमदार असल्यानं ‘बॅट’ला फायदा झाला. पण मग ‘कप-बशी’ला ४० हजारावर मतं कशी पडली? ती कुणाची आणि कुणी-कुणी वळवली, याचं उत्तर काका आणि विशालच शोधतील!

जाता-जाता
हातकणंगलेत २००९ मध्ये राष्टÑवादीच्या उमेदवार होत्या निवेदिता माने आणि स्टार प्रचारक होते जयंत पाटील. परिणाम : माने हरल्या. २०१४ मध्ये आघाडीचे उमेदवार होते कल्लाप्पाण्णा आवाडे आणि स्टार प्रचारक होते जयंत पाटील. परिणाम : आवाडे हरले. २०१९ मध्ये महाआघाडीचे उमेदवार होते राजू शेट्टी आणि स्टार प्रचारक होते जयंत पाटील. परिणाम : शेट्टी हरले... सोशल मीडियावर ही पोस्ट धुमाकूळ घालतेय. सांगलीतही विशाल यांचे स्टार प्रचारक जयंत पाटीलच होते बहुधा! परिणाम..?

ताजा कलम
ऐन मतदानाच्या आधी दोन दिवस जयंत पाटील यांचा मोबाईल नंबर हॅक झाला होता. त्या नंबरवरून राष्टÑवादीच्या प्रमुख नेत्यांना ‘गोपीचंदचं काम करा’ अशा सूचना हॅकरनं दिल्या होत्या म्हणे! ‘टेक्नोसॅव्ही’ जयंत पाटील यांचा मोबाईल नंबर हॅक होणं आणि हॅकर न सापडणं, त्याउपरही हॅकरनं हुबेहूब त्यांच्याच आवाजात सूचना देणं आणि राष्टÑवादीच्या प्रमुख नेत्यांना-कार्यकर्त्यांना तो साहेबांचाच आवाज वाटणं... सगळं आक्रितच! जिरवाजिरवी... अशी ही जिरवाजिरवी.

Web Title: Jirvajirvi ... Such is Jirvajirvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.