सांगली : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पक्षनेतृत्वावर टीका केल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील चांगलेच चर्चेत आले होते. या टीकेमुळे आमदार जयंत पाटील व दिलीपतात्या पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र शुक्रवारी जिल्हा बँकेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले. दिलीपतात्यांनी जयंतरावांची स्तुती करीत मनोमीलनाचे नवे पर्व सुरू केले. चांगला माणूस, चांगला हात मला हवा होता, तो जयंतरावांच्या रूपाने मिळाल्याचे सांगत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शुक्रवारी जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्चून या मजल्याला ‘कॉर्पोरेट लुक’ देण्यात आला आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्हा बँकेत जयंत पाटील व दिलीपतात्या एकाच व्यासपीठावर आले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून दिलीपतात्या पाटील इच्छुक होते. पण ऐनवेळी पक्षाने शेखर गोरे यांना उमेदवारी दिली. तेव्हा दिलीपतात्यांनी पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली होती. त्यानंतर इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतूनही त्यांनी अंग काढून घेतले होते. या दोन नेत्यांतील अबोला जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र शुक्रवारी जिल्हा बँकेत कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या जयंतरावांना खूश करण्याची संधी दिलीपतात्यांनी सोडली नाही. जयंतराव ‘व्हिजनरी’ नेतृत्व असल्याचा उल्लेख करीत त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण दिले. राजारामबापू साखर कारखान्याचे पहिल्यांदा संचालक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी साडेतीन लाख रुपयांचा संगणक कारखान्यात बसवला होता. तेव्हा आम्ही इतके पैसे कशाला खर्च करायचे, असे म्हणत होतो. पण संगणक आल्यानंतर जयंतरावांनी संपूर्ण यंत्रणाच आधुनिक केली. राज्यातील बहुतांश साखर कारखाने आज संगणकीकृत झाले आहेत, असेही पाटील म्हणाले. नोटा बंदीमुळे जिल्हा बँक संकटात आहे. पण ही बँक बुडणार आहे, विलीनीकरण होणार आहे, असे कोणी अधिकारी सांगत असेल, तर त्याच्यावर खटला दाखल करू, असे सांगताना दिलीपतात्यांनी पॉज घेतला, पण साहेबांनी आपणाला शांत राहण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेवर आयकरचे छापे पडत आहेत. आमच्या बँकेचीही तपासणी झाली आहे. पण बँकेत कुठलीही भानगड नाही. भानगड झाली असेल तर ती पूर्वी. आता सारे काही व्यवस्थित सुरू आहे. बँकेच्या कारभारावर सर्व संचालक खूश आहेत, हे सांगण्यासही दिलीपतात्या विसरले नाहीत. बँकेच्या नूतनीकरणासाठी आपल्याला चांगला माणूस व चांगला हात हवा होता. जयंतरावांशिवाय चांगला हात कुठे आहे, त्यासाठी त्यांच्याहस्ते उद्घाटन केले, असे त्यांनी सांगितले. दिलीपतात्यांच्या स्तुतीवर अनेकदा जयंतरावांनाही हसू येत होते. त्यांनीही भाषणात दिलीपतात्यांच्या कारभाराचे कौतुक केले.(प्रतिनिधी)दिलीपतात्यांचा चष्मा : जयंतरावांना फिट्टभाषणावेळी दोन हजारच्या नोटेवरील रिझर्व्ह बँकेचे वचन जयंतरावांना वाचून दाखवायचे होते. त्यांनी डायसजवळ बसलेले रामदुर्ग यांचा चष्मा घेतला, पण त्या चष्म्यातूनही त्यांना ते वाचता आले नाही. शेवटी दिलीपतात्यांनी आपला चष्मा जयंतरावांना दिला. तो चष्मा घालताच, ‘बघा, दिलीपतात्यांचा चष्मा मला किती व्यवस्थित बसतो आहे’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. जिल्हा बँकेत येणाऱ्या माणसाला अभिमान वाटावा, असे काम सुरू आहे. बँकेची व्यवस्था आधुनिक असावी, यासाठी दिलीपतात्या प्रयत्न करीत आहेत, असेही जयंतराव म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांतील दुरावा संपल्याचे चित्र होते.
जयंतराव-तात्यांचा अबोला संपला..!
By admin | Updated: December 23, 2016 23:47 IST