नगरपालिका : जयंत पाटील यांचा निर्णय अंतिम
अशोक पाटील■ इस्लामपूर
महाराष्ट्र शासनाने विद्यमान नगराध्यक्षांची मुदत सहा महिने वाढविली आहे. त्यामुळे अरुणादेवी पाटील यांना अडीच वर्षानंतर आणखी ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी सन्मानाने राजीनामा देऊन इतर महिलांना संधी द्यावी, म्हणून काही नगरसेवकांमधून खलबते सुरु आहेत. परंतु याचा अंतिम निर्णय जयंत पाटीलच घेणार असल्याने पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यावर बोलण्यास तयार नाहीत.
सौ. अरुणादेवी पाटील यांना पुन्हा सहा महिन्यांची संधी मिळाली आहे. त्यांनी पाच वर्षे नगराध्यक्षपद भूषविले आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सौ. पाटील यांनी पुढील सहा महिन्यांसाठी दुसर्या महिला नगरसेवकास सन्मानाने संधी द्यावी, अशी चर्चा पालिका वतरुळातून जोर धरू लागली आहे. या निर्णयाचा चेंडू जयंत पाटील यांच्या कोर्टात जाणार आहे.
येणार्या सहा महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदासाठी लता कुर्लेकर, कविता पाटील, नीलिमा कुशिरे, शुभांगी शेळके, छाया देसाई, मनीषा पाटील या इच्छुक आहेत. या नगरसेविका पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष शामराव पाटील यांच्या संपर्कात आहेत.
नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांच्यानंतर इच्छुक सहा महिलांपैकी एकीला संधी दिल्यास उर्वरित पाच महिला नगरसेवकांत नाराजीचा सूर उमटून विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, सौ. अरुणादेवी पाटील यांनाच सहा महिन्यांचा कालावधी वाढवून द्यावा, असाही सूर राजकीय वतरुळातून आहे.
सहा महिन्यांसाठी इच्छुक असलेल्या लता कुर्लेकर, नीलिमा कुशिरे या विजयभाऊ गटाच्या मानल्या जातात, तर मनीषा पाटील, शुभांगी शेळके एन. ए. परिवाराच्या आहेत. छाया देसाई या डांगे गटाच्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीत मोठी स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेतून राष्ट्रवादीला फटका बसणार की फायदा होणार, यावरच जयंत पाटील निर्णय घेणार आहेत. त्यामुळेच रविवारी उशिरा जयंत पाटील आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष शामराव पाटील यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचे समजते. विद्यमान नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांना पुन्हा सहा महिन्यांची संधी मिळाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी उर्वरित खुल्या गटातील महिला नगरसेविका इच्छुक आहेत. परंतु कोणाला न्याय द्यायचा, ही तारेवरचीच कसरत ठरणार आहे. याबाबतचे सर्व निर्णय ग्रामविकासमंत्री जयंत पाटीलच घेणार आहेत.
- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद.