इस्लामपूर : शासनाने कोविड महामारीच्या विरोधात राज्यामध्ये संचारबंदी घोषित केलेली आहे. या संचारबंदीचे पालन इस्लामपूर व आष्टा शहरामध्ये होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यात येईल, असे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. अशा व्यक्ती लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती असण्याची व त्यांच्यामार्फत कोरोनाच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर व आष्टा शहरामध्ये पोलीस व आरोग्य विभागाची संयुक्त पथके तयार करून अशा व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास अशा व्यक्तीची रवानगी तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये सक्तीने केली जाईल व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या चाचण्यांचे निष्कर्ष विचारात घेऊन येत्या काळात वाळवा तालुक्यातील अन्य मोठ्या गावांमध्ये देखील याच पद्धतीची पथके कोरोना प्रचारास आळा घालण्यासाठी नेमण्यात येतील, असेही सबनीस म्हणाले.