सांगली : सांगलीमध्ये श्री गणपती पंचायतन संस्थानच्या वतीने दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. यंदाची रविवारी विधीपूर्वक त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.चोर गणपतीच्या प्रतिष्ठापनेची परंपरा सुमारे १५० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्याचे आगमन अतिशय गुप्तपणे होते, म्हणूनच त्याला 'चोर गणपती' असे नाव पडले आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला त्याची स्थापना होते. कागदाच्या लगद्यापासून बनवलेला हा पर्यावरणपूरक गणपती आहे. त्याचे विसर्जन केले जात नाही. भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच ऋषीपंचमीला विसर्जन विधी झाल्यानंतर तो पुन्हा मूळ ठिकाणी परत ठेवला जातो. पुढील वर्षी पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते. चोर गणपतीच्या आगमनानंतर पंचायतनच्या गणेशोत्सव सोहळ्यास प्रारंभ होतो. माजी संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी या परंपरेला सुरुवात केली होती. रविवारी गणेश मंदिरात विधिपूर्वक त्याची प्रतिष्ठापना झाली. उत्सवानिमित्त मंदिरामध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त दरबार हॉलचीही विशेष सजावट करण्यात आली आहे.
१५० वर्षांची परंपरा, कागदी लगद्याची देखणी मूर्ती; सांगलीत चोर गणपतीची प्रतिष्ठापना, का पडलं असं नाव.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:24 IST