चूक झाली तर गाठ माझ्याशी

By Admin | Updated: June 17, 2016 00:24 IST2016-06-16T23:27:01+5:302016-06-17T00:24:38+5:30

अजित पवार : तासगावात आबांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

If you make a mistake, contact with me | चूक झाली तर गाठ माझ्याशी

चूक झाली तर गाठ माझ्याशी

तासगाव : आबांचे काम मोठे आहे. याचा विसर पडू देऊ नका. सामान्य जनता आपल्यासोबत आहे. तिकीट देताना सर्वांना सामावून घ्या. जनमानसात चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता राष्ट्रवादीच्याच पाठीशी राहील. आबांच्या नावाला साजेसे काम करा, चूक झाली तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना दिला.
तासगाव येथे बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन आणि बाजार समितीच्या बेदाणा सेल हॉलचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाले की, आबांनी राजकारणात कधीही निष्ठा सोडली नाही. मात्र त्यांच्या पश्चात काहींनी पक्ष सोडला. त्यांच्या पश्चात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपालिका निवडणुकीत चांगल्या विचारी माणसांना संधी द्या. कोणी कितीही प्रलोभन दाखवले, दमदाटी केली तरी, ही माणसे सोबत राहायला हवीत. आबांच्यासोबत सर्व जाती-धर्माची माणसे होती. सर्व समाजाला सामावून घेऊन, महिला, तरुण, अनुभवी लोकांना तिकिटे द्या. सुमनतार्इंच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जा.
ते म्हणाले की, दुष्काळावरुन लक्ष हटविण्यासाठी पाऊस येणार म्हणून वावड्या उठविल्या जात आहेत. बाजार समित्या मोडीत काढून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग सरकारकडून सुरु आहेत. साखरेवर निर्यातबंदी घालून ऊस उत्पादकांना अडचणीत आणले जात आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना कर्जमाफी दिली जात नाही. उद्योगांना मात्र सवलती दिल्या जातात. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे.
शशिकांत शिंंदे म्हणाले की, अधिकारी खुर्चीत बसल्यानंतर लगेचच बदलीचे पत्र हातात दिले जाते. असा कारभार सध्याच्या सरकारमध्ये सुरू आहे. पक्षातून कोण गेले, कोण आले, यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत ताकद दाखवून द्या.
यावेळी स्मिता पाटील, दिनकरदादा पाटील, बेदाणा व्यापारी अशोक बाफना यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती सतीश झांबरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)+

विरोधकांच्या : दमबाजीचा समाचार
कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्याची, दमदाटीची भाषा काही नेत्यांकडून वापरली जात असेल. मात्र काहींच्या फक्त तोंडात दम असतो. आपण कोणाच्या नादी लागायचे नाही अन् कोणी आपल्या वाटेला आला, तर सोडायचे नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी तालुक्यातील विरोधकांचा समाचार घेतला. तत्पूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकरदादा पाटील यांनी, बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या प्रसंगात कोणीही मदत केली नसल्याची खंत व्यक्त करुन, ग्रामपंचायतीसह अन्य निवडणुकांत गुंडगिरी करुन जिंकण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनीही, जिल्ह्यात सत्तेच्या जोरावर विरोधकांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दडपशाहीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप केला होता.

खासदार, आमदार झोपा काढतायत काय?
युतीचे पाच आमदार आणि एक खासदार असताना, जिल्ह्यातील पाणी योजना सहा महिने बंद राहतात. मग तुम्ही सत्तेत कशासाठी आहात? जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्याचा. तो किती लक्ष देणार? पाणी योनजांची कार्यालये विदर्भात गेली तरी हे सत्ताधारी आमदार, खासदार झोपा काढतायत का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

Web Title: If you make a mistake, contact with me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.