कशी होणार इस्लामपूरची बारामती?
By Admin | Updated: December 24, 2015 00:51 IST2015-12-23T23:52:08+5:302015-12-24T00:51:09+5:30
जागोजागी घाणीचे साम्राज्य : नगराध्यक्षांच्याच ‘मॉर्निंग वॉक’चा रस्ता प्रदूषणमय!

कशी होणार इस्लामपूरची बारामती?
इस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी राजारामबापू साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी येतात. नगराध्यक्षांसह शहरातील नागरिक या मार्गाचा व्यायामासाठी वापर करतात. परंतु या रस्त्याकडेच्या गटारी तुंबल्या असून, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याची दुर्गंधी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांना सहन करावी लागते. त्यामुळे इस्लामपूरची ‘बारामती’ कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इस्लामपूर शहर ते राजारामबापू साखर कारखाना या रस्त्यावर पहाटे फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. नगराध्यक्ष सूर्यवंशी हेही गेल्या काही वर्षांपासून न चुकता येथे मॉर्निंग वॉकसाठी येतात. या रस्त्याकडेला इस्लामपूर हायस्कूल, ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल व राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. त्यांच्या संरक्षक भिंतीलगतच गटारी आहेत. त्या तुंबल्या आहेत. या दुर्गंधीचा त्रास मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. याचा त्रास खुद्द नगराध्यक्षांना होत असला तरी, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते. ही बाब व्यायामासाठी येणाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील बहुतांश वेळ याच मार्गावरुन ये-जा करतात. तेही या समस्येबाबत अनभिज्ञ आहेत. पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पदपाथ केला आहे. त्यालगतच गटारी आहेत. या गटारींच्या भिंतीनाच काहींनी शेण्या लावल्या आहेत. त्या शेण्या पाण्यात पडून अनेकवेळा गटारी तुंबत आहेत. त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. या गटारी तात्काळ प्रवाहित कराव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ आम्ही या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी येतो. तुंबलेल्या गटारींमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये आहेत. या इमारतींच्या संरक्षक भिंतीनजीक गटारी तुंबलेल्या आहेत.
- डॉ. सुरेंद्र उमराणी, डॉ. अमृत पाटील,
इस्लामपूर.
पटांगणावर भाडे : हेलिपॅडवर कचरा
राजारामबापू साखर कारखान्याकडे जाणाऱ्या याच रस्त्यावर शहरानजीक खुले नाट्यगृह आहे. त्याच्या पटांगणावर काही वृध्द सकाळी फिरण्यासाठी येत असतात. परंतु पालिकेने त्यासाठी प्रतिमहा पन्नास रुपये भाडे आकारले आहे. त्यामुळे अनेकांनी रस्त्यावरून चालणेच पसंत केले आहे. साखर कारखान्याच्या हेलिपॅडच्या मैदानावर फिरणेही मुश्कील झाले आहे. तेथे फिरावयास गेलेल्या नागरिकांना डोळ्यात कचरा जाण्याचा त्रास होऊ लागला आहे.