सरकारला दुष्काळाचं देणं-घेणं नाही!

By Admin | Updated: June 17, 2016 00:23 IST2016-06-16T23:54:33+5:302016-06-17T00:23:29+5:30

अजित पवार यांची टीका : आटपाडीत राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा; विविध कार्यक्रम

Government does not want to make drought! | सरकारला दुष्काळाचं देणं-घेणं नाही!

सरकारला दुष्काळाचं देणं-घेणं नाही!

आटपाडी : या सरकारकडे कसलंही नियोजन नाही. त्यामुळे राज्य यांनी किती तरी वर्षे मागं नेलं. हे सरकार झोपेचं सोंग घेऊन चाललं आहे. यांना दुष्काळी भागाशी काहीही देणं-घेणं नाही. मुख्यमंत्री म्हणतात, प्रशासन आमचं ऐकत नाही. मग निर्णय होणार कसे? तुम्ही चांगल्या माणसांना घरात बसवलं, म्हणून राज्याचं वाटोळं झालं. पण ज्या जनतेनं यांना डोक्यावर घेतलं, तीच जनता येत्या निवडणुकांमध्ये त्यांना पायदळी तुडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड व्यापारी संकुल आणि पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आ. पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
पवार म्हणाले की, उच्च न्यायालयाने खडसावलं तरच सध्या हे सरकार निर्णय घेत आहे. आम्ही दुष्काळी परिस्थितीत कधीही निधी कमी पडू दिला नाही, पण यांचं कोणतंच नियोजन नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर नाहीत. जनावरांसाठी छावण्या नाहीत. जनावरांना बाजारही दाखवायचा नाही. हे शहरी भागातील नेते आहेत. ग्रामीण भागाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल यांना कसलीही आस्था नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, प्रेम नाही. आपली जिवाभावाची माणसं जर केंद्र आणि राज्यात सत्तेत नसली तर काय होतं, त्याचा विचार करा, असा सवालही त्यांनी शेतकऱ्यांना केला.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, एवढा मोठा दुष्काळ असून पाण्याचे टॅँकर नाहीत. जनावरांसाठी छावण्या नाहीत. टेंभू योजनेची आवर्तने ठरविणे गरजेचे आहे. उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात सोडले पाहिजे. यासाठी आता तीव्र आंदोलने करू.
जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले, बाबासाहेब देशमुखांनी तालुक्याची निर्मिती करून तलाव केले. ही भांडी आता टेंभू योजनेच्या पाण्याने भरली आणि पाणी उचलण्यासाठी शेतकऱ्यांना परवाने दिले, तर त्याचा फायदा होईल. कडेपूर आणि सांगोला तालुक्यात असे परवाने दिले आहेत. फक्त आटपाडीत परवाने दिले जात नाहीत. यामध्ये राजकारण आहे. विरोधक आडकाठी आणत आहेत. जयंतरावांच्या आटपाडीच्या मेळाव्याला, ‘दुष्काळी दौरा का मान्सून दौरा?’ म्हणून हिणवलं, त्या आ. अनिल बाबर यांनी टेंभू योजनेसाठी काहीही केलेलं नाही.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, जि. प.च्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उदयसिंह देशमुख, कुसूम मोटे, सुमन देशमुख, भागवत माळी, भाऊसाहेब गायकवाड, हर्षवर्धन देशमुख, ऋषिकेश देशमुख उपस्थित होते. (वार्ताहर)


नरेंद्र मोदी देशाचे नव्हे : जगाचे पंतप्रधान!

लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षात १५ रुपये तरी जमा केले का? लालूप्रसाद म्हणतात, मोदी देशाचे नाही, जगाचे पंतप्रधान आहेत. ते चीन, पाकिस्तानचा दौरा करतात, पण हे देश सैनिक भारतात घुसवत आहेत. महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी ४४ सभा घेतल्या. आता दुष्काळ पडलाय, त्यांनी एकदा तरी दुष्काळी दौरा केला काय?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
निवडणुकीनंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणारे मुख्यमंत्री आता अभ्यास करायला पाहिजे म्हणतात. मग तेव्हा बारामतीत ज्यूस हातात घेऊन आश्वासनं कशी दिली? या सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Government does not want to make drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.