सांगली : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त सांगलीत धडकताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. टिळक स्मारक मंदिरात आयोजित आदरांजली सभेत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले. या यशात मुंडेंचा मोठा वाटा होता. गड आला, पण महाराष्ट्राचा सिंह गेला, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. भाजपचे खासदार संजय पाटील, नीता केळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, धनपाल खोत, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, प्रकाश बिरजे, हणमंत पवार, बाळासाहेब कुलकर्णी, युवराज बावडेकर यांच्यासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खा. पाटील म्हणाले की, १९९५ मध्ये मुंडेंनी मला राज्यमंत्री पदाची आॅफर दिली. तेव्हापासून आमचा स्नेह होता. खासदारकीची उमेदवारीही त्यांनीच दिली. त्यांच्या निधनाने राज्यात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. गरिबांची जाण असलेले ते नेते होते. राजकीय वारसा नसतानाही मोठ्या कष्टाने ते अत्युच्च पातळीवर पोहोचले. त्यांच्या निधनाने पृथ्वी गरीब झाली आणि स्वर्ग श्रीमंत झाला आहे. नीता केळकर म्हणाल्या की, मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखत. वसंतदादा यांच्यानंतर कार्यकर्त्यांना जाणणारे एकमेव नेते होते. ते व नितीन गडकरी यांच्या केंद्रीय मंत्रिपदामुळे राज्यातील जनता सुखावली होती; पण त्यांच्या निधनाने गड आला, पण सिंह गेला, अशी स्थिती झाली आहे. सुधीर गाडगीळ म्हणाले की, मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक स्नेह होता. त्यांना कधीही विसरता येणार नाही. त्यांचे हृदयातील स्थान कायम राहील. दीपक शिंदे म्हणाले की, मुंडे यांनी विश्वास दिल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वच्छ मनाचा निर्भय नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले. (प्रतिनिधी)
गड आला, पण सिंह गेला..!
By admin | Updated: June 4, 2014 00:02 IST