फोटो ओळी : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) येथील अमर ऊर्फ अमृत शिंदे यांचे पाण्याविना काळवंडलेले पीक.
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : ऑगस्ट महिनाअखेरीस आला तरी अद्याप कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर अद्याप जोरदार पाऊस झाला नाही. पाण्याची ओढ आणि उन्हाचा जोर वाढल्याने पिकांना झळ बसत आहे. ओढे, नाले, बंधारे व तलावातील पाणीपातळी खालावली आहे. अशा स्थितीमुळे बळिराजा हवालदिल झाला आहे.
घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरातील सध्या पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामात मान्सूनच्या सुरुवातीला रिमझिम व तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाच्या ओलीवरच बळिराजाने खते, औषधे, बी-बियाणे व मशागतीवर हाजारो रुपये खर्च करून पेरा केला. त्याची उगवणही चांगली झाली. यानंतर केवळ तुरळक सरीवर पिकांनीही जोमात आली. पण, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली.
सध्या प्रखर उन्हाने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. कडधान्य पीक फुलोऱ्यात आहे. काही ठिकाणी शेंगा तयार होत आहेत, तर ज्वारी, बाजरी, मका ही पिके पोटऱ्याला आली आहेत. आगाप पेरणीतील पिकाची कणसे तयार झाली आहेत. ही पिके सध्या भरात आली असून, पावसाविना ती धोक्यात आली आहेत.
काही शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देत होते; पण त्यालाही थकीत बिलापोटी वीज कनेक्शन तोडल्याचा फटका बसत आहे. यामुळे बळिराजा धास्तावला असून, तो मोठ्या पावसाची आपेक्षा व्यक्त करीत आहे.
चौकट
सिंचन योजनेची मागणी
पावसाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने बसत आहे. यामुळे टेंभू योजनेंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसाजलसिंचना योजना तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.