सांगली : भाजपअंतर्गत छुप्या गटबाजीला आता उधाण आले आहे. प्रदेश कार्यकारिणीनेही या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे पक्षांतर्गत संघर्षाला बळ मिळत आहे. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे विधानसभेची तयारी सुरू केली आहे. एरवी काँग्रेस आणि भाजपमध्ये असणारे कुरघोड्यांचे राजकारण थांबले असून, भाजपअंतर्गत दोन गटातच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. संभाजी पवार आणि नीता केळकर यांचे गट एकमेकांविरोधात काम करीत आहेत. केळकर यांच्या बाजूने पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण गट एकवटला आहे, तर पवारांकडे त्यांचा पूर्वीचा गट कार्यरत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्यांनी सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. प्रदेश व केंद्रीय नेत्यांसमोर दीड महिन्यांपूर्वी या दोन्ही गटांनी एकमेकांच्या चुकांचे पाढे वाचले होते. उमेदवारी देण्यावरून स्पष्टपणे विरोध दर्शविला होता. गोपीनाथ मुंडे यांच्यामार्फत दोन्ही गटांना सबुरीचा सल्लाही देण्यात आला होता. आता मुंडेंअभावी दोन्ही गटांत समन्वय साधणे मुश्किल झाले आहे. प्रदेशच्या नेत्यांनी लोकसभेवेळी बंडखोरी, गटबाजी थांबविण्याचा प्रयत्न केला. कोणालाही यात यश मिळाले नाही. ही गटबाजी रोखण्यासाठी पुढाकार कोण घेणार, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)
भाजपअंतर्गत छुप्या संघर्षाला उधाण
By admin | Updated: June 13, 2014 02:01 IST