शुक्रवारी दुपारी लसीचा साठा संपल्याने जिल्हाभरातील २२७ केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले होते. अनेक लाभार्थ्यांना लस न घेताच परतावे लागले. विशेषत: दुसऱ्या डोससाठी आलेल्यांना ती घेता आली नाही. जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दोन लाख लसींचे डोस मागितले होते, प्रत्यक्षात ६८ हजार डोस मिळाले. शनिवारी पहाटे जिल्हा परिषदेला ते मिळाले. त्यानंतर डोस घेऊन तातडीने गावोगावी गाड्या रवाना झाल्या. आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रांनी गावागावांत लस आल्याचे निरोप दिले, त्यानंतर लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेतली.
प्रत्येक आरोग्य केंद्रात दररोज किती लसीकरण होते याचा अंदाज घेऊन आरोग्य विभागाने लस वितरित केली. सरासरी प्रत्येक केंद्राला दीड हजार डोस दिले. महापालिकेला पाच हजार डोस दिले. खासगी रुग्णालयांत अद्याप काही डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात सध्या दररोज सरासरी १५ ते १८ हजार डोस दिले जातात. या हिशेबाने ६८ हजार डोस जास्तीत जास्त मंगळवारपर्यंतच पुरणार आहेत. तत्पूर्वी आणखी काही डोस मिळण्याची आरोग्य विभागाला अपेक्षा आहे.
चौकट
आजही लसीकरण सुरू राहणार
शनिवारी दिवसभरात ग्रामीण भागात १६ हजार ९६ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली. निमशहरी भागात ९३२ जणांना, तर महापालिका क्षेत्रात एक हजार ९९६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. लसीकरणाची गती कायम राखण्यासाठी आज, रविवारीही सर्व शासकीय लसीकरण केंद्रांत लसीकरणाचे काम सुरू राहणार असल्याचे मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.
चौकट
आजवर ३ लाख ३८ हजार डोस मिळाले
जिल्ह्याला आजअखेर ३ लाख ३८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पैकी कोव्हिशिल्डचे डोस २ लाख ४७ हजार आहेत. शनिवारअखेर २ लाख ७८ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.