लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : देशाच्या सर्व राज्यात गेल्या शंभर ते सव्वाशे वर्षांपासून सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या गलाई बांधवांचे विटा शहराच्या वैभवात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे संस्मरण होण्यासाठी विटा शहरातील मोठ्या चौकाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय गलाई बांधवांनी घेतला आहे. त्यासाठी चौकातील जागेची मागणी नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनर्स ॲन्ड ज्वेलर्स संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आ. अनिल बाबर यांना सोमवारी विटा येथे देण्यात आले.
खानापूर तालुक्यासह परिसरातील तालुक्यातील सोने-चांदी गलाई बांधवांचे श्रध्दास्थान विटा नगरी आहे. या शहराच्या समृध्दीसाठी गलाई बांधव आजही मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांच्या गेल्या १०० ते १२५ वर्षांच्या आगळ्या-वेगळ्या इतिहासाचे संस्मरण व्हावे व त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान भावी पिढीमध्ये गौरविला जावा, अशी गलाई बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासून इच्छा आहे.
त्यामुळे गलाई बांधवांच्या कार्याची आठवण राहावी, यासाठी विटा शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गलाई बांधवांनी विटा शहरातील महत्त्वाचा मोठा चौक सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील मोठ्या चौकाची जागा संघटनेला मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन आ. अनिल बाबर यांना संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी मनोहर जाधव, शंकर पवार, नामदेव पाटील, वसंतराव पवार, लक्ष्मण खंदारे, अर्जुन गायकवाड, विजय गायकवाड यांच्यासह गलाई बांधव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.