फोटो ओळ : जत तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांना नुकसानभरपाई अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना सुयेश नाईक, खंडू शिंदे, रोहित चव्हाण यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : शासनाने अतिवृष्टीसाठी १० हजार व २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली होती. ते अनुदान शेतकऱ्याला द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, तूर, मका या पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा पंचनामा स्थानिक पातळीवरील कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांनी केला.
कृषी विभागाने अनुदानाच्या याद्या तयार करून प्रशासनाकडे पाठविल्या. यादीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत केली आहे. यादी दुरुस्त करून शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जिरायत व अश्वासित सिंचनाखालील पिकांना १० हजार रुपये व बहुवार्षिक पिकांना हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे जादा नुकसान होऊनसुद्धा त्यांना अनुदान अद्याप मिळाले नाही ते मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी खंडू शिंदे, रोहित चव्हाण उपस्थित होते.