सांगली : शहरातील प्रभात मंदिर मतिमंद मुलांच्या शाळेच्या संचालकासह इतरांवर खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली मिलिंद जाधव (रा. वखारभाग, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रभात मंदिर शाळेच्या जाधव मुख्याध्यापिका आहेत, तर त्यांचे पती सचिव व दीर संचालक आहेत. याव्यतिरिक्त असलेल्या इतर संचालकांनी खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून ते सादर केल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अजितराव उध्दव सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, नागनाथ पोपट निकम, अक्षय राजाराम कदम, शुभांगी अजित सूर्यवंशी, लक्ष्मी धोंडीराम कदम, संतोष भगवान साळुंखे, वैभव मुरलीधर सूर्यवंशी, जोतिराम नामदेव सूर्यवंशी, सुनील कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ कालावधित बनावट प्रतिज्ञापत्रात फिर्यादीसह तिघे सभेस उपस्थित असल्याचे भासविण्यात आल्याचे व तशा प्रोसिडिंगवर खोट्या सह्या करून तो खरा म्हणून सादर केल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.