लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाची सांगता अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते साखर पाेत्यांच्या पूजनाने करण्यात आली.
मोहनराव कदम म्हणाले, साेनहिराने २१ व्या गळीत हंगामामध्ये १५८ दिवसांत ९ लाख ४७ हजार टन उसाचे गाळप केले. ११ लाख ६७ हजार ६५० क्विंटल साखर पोती उत्पादन केले. कारखान्याच्या सर्वच ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणांनी चांगले काम केल्यामुळे हा गळीत हंगाम यशस्वी झाला. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १५९ दिवसात ६ काेटी ९० लाख ६३ हजार ३०० युनिटस् वीज निर्मिती झाली. त्याचप्रमाणे डिस्टिलरीच्या मे. अल्फा लाव्हल यांचे प्रकल्पातून रेक्टिफाईड स्पिरिट ६३ लाख ६७ हजार २१३ लिटर्स, प्राज इंडस्ट्रीज प्रकल्पातून रेक्टिफाईट स्पिरिट २० लाख ४३ हजार ३३४ लिटर्स आणि ई. एन. ए. २८ लाख १८ हजार २३३ लिटर उत्पादन मिळाले. हे दोन्ही प्रकल्प गळीत हंगाम सांगता समारंभानंतरही चालू राहणार आहेत. यावेळी सर्वाधिक ऊस वाहतूक ठेकेदार, तोडणी-वाहतूक ठेकेदार, सर्वाधिक बैलगाडी ऊस वाहतूक कामगार यांना गौरविण्यात आले.
शेती अधिकारी प्रशांत कणसे यांनी स्वागत केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव महिंद, संचालक निवृत्ती जगदाळे, बापूसाहेब पाटील, युवराज कदम तसेच खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. उप शेती अधिकारी वैभव जाधव यांनी आभार मानले.