सांगलीच्या विकासाचा रोड मॅप तयार करणार
By Admin | Updated: June 17, 2016 00:26 IST2016-06-16T23:21:12+5:302016-06-17T00:26:58+5:30
रवींद्र खेबूडकर : शहरांचं रुपडं बदलण्याचा प्रयत्न
सांगलीच्या विकासाचा रोड मॅप तयार करणार
सांगली : महापालिकेचे नूतन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून कामाचा धडाका लावला आहे. पहिल्यांदाच महापालिका प्रशासन जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. शहराचा खुंटलेला विकास, अपूर्ण योजना, ढिसाळ प्रशासन अशा अनेक प्रश्नांवर मार्ग काढत खेबूडकर यांना वाटचाल करावी लागणार आहे. गुरुवारी खेबूडकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन शहराच्या विकासाची संकल्पना मांडली. येत्या आठवड्याभरात ‘रोड मॅप’ तयार करून विकासाला गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : शहराच्या विकासाच्यादृष्टीने कोणती पावले उचलणार आहात?
उत्तर : आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर अनेकांनी चांगल्या सूचना केल्या आहेत. त्यांचा विचार करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करणार आहोत. येत्या आठवडाभरात रोड मॅप तयार करणार आहोत. लोकांच्या सूचना घेणार आहोत. सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचा मानस आहे. महापालिका प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. विस्तारित भागात लोकांचे प्रश्न गंभीर आहेत. प्रशासनाने लोकांशी चांगले बोलले पाहिजे, अशी भावना आहे. नियमित व स्वच्छ पाणी दिले पाहिजे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे, आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत. ही जबाबदारी महापालिकेची आहे. रस्ते, गटारी, ड्रेनेज यांनाच प्राधान्य देणार आहोत.
प्रश्न : महापालिका प्रशासनाला गती देण्यासाठी काय करणार आहात?
उत्तर : घरातला कर्ता माणूस काम करू लागला, तर घरातील सर्वच माणसे काम करू लागतात. मला खुर्चीत बसून काम करण्याची सवय नाही. ‘फिल्ड’वर जाऊन लोकांचे प्रश्न समजावून घेऊ. जनतेचे वैयक्तिक अथवा सामाजिक प्रश्न असोत, त्यांना दिलासा दिला, तर महापालिकेबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल. सर्वच प्रश्न एकाचवेळी सुटतील असे नाही. पण विश्वास असेल तर जनताही समजावून घेईल. त्यासाठी अधिकाऱ्यांना, फिल्डवर जा, प्रश्न ऐकून घ्या आणि त्यादृष्टीने कारवाई सुरू करा, अशी सूचना केली आहे.
प्रश्न : महापालिकेवर खाबूगिरीचा शिक्का बसला आहे. नगररचना, गुंठेवारीसह अनेक भागात सावळागोंधळ आहे. त्याला चाप कसा लावणार?
उत्तर : माणूस एका गोष्टीत भ्रष्टाचारी असेल, तर सर्वच गोष्टीत तो भ्रष्टाचारी असतो. ही बाब पूर्णपणे नष्ट करता येत नाही. पण ती निश्चितच कमी करता येते. त्यासाठी कामकाजात पारदर्शीपणा आणण्याची गरज आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, मालमत्ता विभागाचे देता येईल. एक हजार चौरस फुटाची मालमत्ता असेल, तर तो पाचशे फूट दाखवितो. त्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्तांचा सर्व्हे करणार आहोत. खाबूगिरीला चाप लावण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रश्न : बीओटीमुळे महापालिका बदनाम झाली आहे. आता पुन्हा बीओटीचा घाट घातला जात आहे. त्याबाबत भूमिका काय आहे?
उत्तर : बीओटी हे शासनाचेच धोरण आहे. हे धोरण महापालिकेच्या नफा, तोट्याचा विचार करून राबवावे लागेल. बीओटीवर महापालिकेची मालकी राहिली पाहिजे. ही मालमत्ता जनतेची आहे. ती अशीच घालवून चालणार नाही. शासनाने परवानगी दिल्यास, जनतेचा, महापालिकेचा फायदा होत असेल, तर निश्चित विचार करू.
प्रश्न : महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी काय नियोजन आहे?
उत्तर : उत्पन्नासाठी अनेक स्रोत आहेत. हे स्रोत उघड झाले पाहिजेत. सार्वजनिक मालमत्तेचा वापर करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत पैसे भरावे लागतील. त्यात कसलीही तडजोड नाही. आता घरपट्टीची ३० कोटी, पाणीपट्टीची २० कोटी थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के वसुली झाली तरी, २५ कोटी पालिकेच्या हाती येतील. एक जुलैपासून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेऊ. पुढील तीन महिन्यात वसुली हेच मुख्य उद्दिष्ट असेल. मोठ्या थकबाकीदारांची नावे चौका-चौकात डिजिटल उभारून जाहीर करणार आहोत.
- शीतल पाटील
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत आयुक्त म्हणाले की, शहरातील चायनीज पदार्थांचे गाडे, मटण-चिकन विक्रीच्या दुकानांमधील कचरा कोंड्याळात टाकला जातो. तिथे कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. महापालिकेने कुत्र्यांच्या लसीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी खासगी ठेकाही दिला आहे. चायनीज सेंटर, हॉटेलमधील कचरा उचलण्याचा मध्यंतरी ठेका दिला होता. पण आवश्यक त्या प्रमाणात कचरा उचलला जात नाही. हा ठेका रद्द करून नवीन ठेका काढू. हा सारा कचरा सायंकाळीच उचलला जावा, असे नियोजन करू. ठेकेदार काम करीत नाही आणि महापालिका मात्र बदनाम होते. आरोग्य विभागातच नव्हे, तर बांधकाम विभागातही असाच प्रकार आहे. दोन-दोन वर्षे कामाची आॅर्डर देऊनही ते काम सुरू झालेले नाही. अशा ठेकेदारांची यादी तयार करण्याची सूचना केली आहे.
अतिक्रमणे हटविणार
रस्त्यांवरील बाजार, कचरा उठाव, नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत ते म्हणाले की, आठवडा बाजाराचा कचरा सकाळी उचलला जातो. त्यानंतर औषध फवारणी होते. आता त्यात बदल करून, रात्रीच्या वेळीच बाजारातील कचरा उचलण्याचे नियोजन करणार आहोत. त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करू. तसे आठवडा बाजार रस्त्यावर भरविणे चुकीचेच आहे. मिरजेत तर न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यासाठी विक्रेत्यांशी लवकरच चर्चा करणार आहोत. त्यांना समजावून सांगून त्यांचे पुनर्वसन करू. अतिक्रमण म्हणजे समाजाच्या मालमत्तेवर तुम्ही हक्क सांगत आहात. ते गैर आहे. नालेच नव्हे, तर सर्वच ठिकाणच्या अतिक्रमणांबाबत कठोर धोरण निश्चित करीत आहोत.