लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल होत असल्याने आता मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने शनिवारी सांगलीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सांगलीतील मारुती मंदिरासमोर शासन धोरणाविरोधात श्रीरामचा जयघोष करीत घंटानाद करण्यात आला. आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने महाविकास आघाडी सरकारने हळूहळू गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मात्र, दोन वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांची उपासमार होत आहे.
भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार म्हणाले की, बीअर बार, मॉल, आठवडा बाजार यासारखी गर्दीची ठिकाणे आघाडी सरकारने सुरू केली. मात्र, मंदिरे सुरू केलेली नाहीत. मंदिरे बंद ठेवण्यामागे आघाडी सरकारचे धोरण कळत नाही. पहिली लाट ओसरल्यानंतरही निर्बंध शिथिल करताना मंदिरे उघडण्याबाबत अत्यंत उशिरा निर्णय घेण्यात आला होता. दुसरी लाट ओसरत असतानाही मंदिरांबाबत दुजाभाव केला जात आहे.
आंदोलनात पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, युवराज बावडेकर, रेखा पाटील, श्रीकांत शिंदे, अविनाश मोहिते आदी सहभागी झाले होते.