सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : सांगली वार्ड क्रं.१० मध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भाजप आणि आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आज सकाळी घेराव घातला. येथील पाणी अन्यत्र वळविल्याचा आरोप नगरसेवक जगनाथ ठोकळे यांनी केला असून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन वसाहत, जासुद मळा, वडर काॅलनी, शिवाजीनगर, टिंबर एरिया, भिमनगर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. भाजप-आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि या परिसरातील नागरिकांनी आज सकाळी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी, शाखा अभियंता अमिर मुलाणी तसेच पाईप निरीक्षक सतिश माळी यांना घेराव घालत जाब विचारला.
यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा, अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा काढू असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. महापालिका पाणीपुरवठा विभागाने या भागातील पाणी अन्य ठिकाणी वळवले असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केला आहे. तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिले आहे. पाणीपुरवठा विभागाकडे सक्षम अधिकाऱ्यांची गरज असून शासनाकडून अधिकारी उपलब्ध करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या भागांमध्ये जलवाहिनीला गळतील लागल्याची शक्यता आहे, यामुळे या भागामध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे, गळती शोधण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. सध्या कोरोनामुळे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी इतर कामाकडे वळविण्यात आलेले आहेत, मनुष्यबळ कमी असल्याचा खुलासा पाणी पुरवठा विभागाने केला आहे.