लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी वस्ती माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली वावरत आहेत. वाडीलगत भेगा पडून डोंगर खचू लागले आहेत. याची भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने पाहणी करून कोकणेवाडीचा डोंगर ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ११ नोव्हेंबर २०१९ ला कळवूनही यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
ऑगस्ट २०१९ मध्ये तहसीलदार गणेश शिंदे यांनी खचलेल्या डोंगराची पाहणी केली होती. त्यांनी तातडीने भूवैज्ञानिकांना बोलावले होते. तहसीलदार शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी पाहणी केली होती. धोटे व मिसाळ यांनी भूस्तर भाग, भौगोलिक परिस्थिती, खडकाची रचना, पाण्याचा निचरा याची चार तास तपासणी केली. कोकणेवाडी डोंगर लालमातीने भरला आहे, दगडाची झीज झाली आहे. मुरूम मातीची धूप झाली आहे. हा थर १० ते २० फूट खोल आहे. तो कठीण दगडापासून सुटलेला आहे. ओढ्यामुळे या डोंगराची झीज वेगाने होत आहे. पाण्यामुळे माती व मुरूम वाहून जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की हा डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगरपायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस मोठा धोका आहे. भाष्टे वस्तीला डोंगरास पडलेल्या भेगांमुळे धोका नाही, मात्र, ही वस्ती दोन ओढ्यांमध्ये असल्याने पाणी पातळी वाढल्यास संपर्क तुटू शकतो, असा निष्कर्ष भूवैज्ञानिकांनी काढला होता.
भाष्टेवस्ती येथे दोन ओढ्यामध्ये सहा घरांतील ४३ व कोकणेवाडी येथील १२ घरांतील ७८ अशा १२१ नागरिकांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. या कुटुंबाचे कायमस्वरूपी स्थलांतर करणे आवश्यक आहे.
कोट या कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्यादृष्टीने सर्व पाहणी करण्यात आली असून याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवला आहे. कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
गणेश शिंदे, तहसीलदार, शिराळा