सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपशी प्रामाणिक नाहीत. त्यांनी नेहमीच राष्ट्रवादीच्या भल्याची आणि सोयीच्या राजकारणाची भूमिका घेऊन काम केले आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, ढालगाव येथील शेतकरी मेळाव्यास भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. घोरपडेंचा या मेळाव्याशी संबंध नाही. नगरपालिका आणि त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घोरपडे यांनी कोणासाठी काम केले, हे सर्वांना माहीत आहे. राष्ट्रवादीला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे. आजवर त्यांनी सोयीचेच राजकारण केले.पक्षाशी ते प्रामाणिक राहिलेले नाहीत. ते भाजपमध्ये आहेत की कोणत्या पक्षात, याचाही आम्ही विचार करणार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. यापुढे आम्ही कोणत्याही कार्यक्रमास त्यांना निमंत्रित करणार नाही. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयंत पाटील यांना दिलेल्या पक्षप्रवेशाच्या आॅफरबद्दल संजयकाका म्हणाले की, मला त्यांच्या आॅफरबद्दल माहिती नाही. जयंत पाटील यांना त्यांनी आॅफर दिली की राजकीय टीपणी केली, हे पाहावे लागेल. अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाने कोणते परिणाम होतील, या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. त्यावर वक्तव्य करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे नियोजन नाही. खासदार म्हणून मला तरी याबाबत कोणतीही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अजितराव घोरपडे भाजपशी अप्रामाणिक
By admin | Updated: December 29, 2016 00:07 IST