सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण पडत असतानाच पुन्हा एकदा रेमडेसिवीरसह इतर औषधांचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा पुरेसा साठा असून, त्याचा काळाबाजार केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रेमडेसिवीर उपयोगी ठरत असल्याने त्यास मागणी मोठी आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही यासाठी व त्यातून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट थांबविण्यासाठी दरपत्रक जाहीर केले आहे. तरीही काही ठिकाणी इंजेक्शनचा तुटवडा असल्याची सांगितले जात आहे.
सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर असा प्रकार घडल्यास त्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
काही ठिकाणी जादा दराने विक्री होत असल्याचे तर काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून रुग्णांच्या नातेवाइकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात ७००हून अधिक इंजेक्शन उपलब्ध असून अजूनही मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन भांडारकर यांनी सांगितले.
कोट
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीरसह इतर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे भासवत कोणी जादा दराने विक्री करत असेलतर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रकार नागरिकांनी प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्यावेत.
नितीन भांडारक, सहा.आयुक्त, अन्न व औषध प्रशासन