शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. रुग्णसंख्या तीनशेच्या जवळ पोहोचली आहे. वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरत असल्याने दि. २९ एप्रिल ते ५ मे अखेर शहरातील
दवाखाने, औषध दुकाने, दूध संकलन वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची माहिती शहर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.
कडेगाव नगरपंचायतीमध्ये नगरसेवक, नगरपंचायत प्रशासन, व्यापारी, भाजीविक्रेते व लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, कडेगाव शहर आपत्ती व्यवस्थापन समिती यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
रुग्णालये व औषध दुकाने वगळता अन्य सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सात दिवस बंद राहणार आहेत. तसेच शहरात कोणालाही फिरून भाजीविक्री करता येणार नाही. या कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तेव्हा सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे व स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कडेगाव शहर आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.