‘बंद’मुक्त टाकवडेची २१ वर्षांची परंपरा

By admin | Published: July 17, 2017 12:17 AM2017-07-17T00:17:23+5:302017-07-17T00:17:23+5:30

‘बंद’मुक्त टाकवडेची २१ वर्षांची परंपरा

21 year old tradition of 'Band' free Tavvadei | ‘बंद’मुक्त टाकवडेची २१ वर्षांची परंपरा

‘बंद’मुक्त टाकवडेची २१ वर्षांची परंपरा

Next


गणपती कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : गावात, राज्यात अथवा देशात कोठेही समाजविघातक घटना घडली की, त्याच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाते. महागाई, पेट्रोल दरवाढ, ऊस आंदोलन, विविध मागण्यांचे आंदोलन असो वा एखादा राजकीय नेता, राष्ट्रपुरुषांचा अवमान होवो, कोणतेही कारण घडले की बंद पुकारण्याचे फॅडच आले आहे. त्यातून बोध तर कोणताच घेतला जात नाही. शिवाय शासकीय मालमत्तेचे नुकसान केले जाते.
यामध्ये सामान्य जनता होरपळली जाते. या सर्व गोष्टीपासून टाकवडे (ता. शिरोळ) हे गाव अलिप्त असून, गेल्या सुमारे एकवीस वर्षांपासून गावाने ‘बंद’लाच रामराम ठोकला आहे. ती परंपरा आजही कायम असून, मोठ्या लोकसंख्येचा व राजकीय गटबाजी व संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावचा बंदबाबतीत घेतलेला वेगळ्या वाटेचा निर्णय आदर्शवत आहे.
इचलकरंजीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे शिरोळ तालुक्यातील टाकवडे हे सुमारे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. समाजवादी विचारसरणीचे साथी शंकरराव निर्मळ, बी. एच. पाटील अशा जिल्ह्यात राजकीय व सहकारात दबदबा असणाऱ्या नेतेमंडळींचे गाव. मात्र, त्यांच्यानंतरच्या काळात गावातील गटबाजीचे राजकारण, ईर्षा, प्रतिष्ठा या प्रमुख कारणांमुळे गावचा म्हणावा तसा विकास झाला नाही.
१९६७ मध्ये मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर पुतळ्याच्या विटंबनेचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामध्ये टाकवडे गावही मागे राहिले नाही. इतकेच नव्हे, तर गावामध्ये सवर्ण विरुद्ध दलित असा वणवा पेटला. मोठी हाणामारी, तोडफोड झाली. पाच ते सात दिवस वाद चालू होता. शिरोळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वाद शमला तरी गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना पोलीस आणि कचेरीच्या फेरीत अडकल्याने पश्चात्ताप जाणवू लागला. या दंगलीतून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे लक्षात येताच गावातील सर्वच गटांची नेते मंडळी, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांवरील तक्रारी मागे घेतल्या व येथून पुढे गावात, राज्यात अथवा देशात कोणत्याही प्रकारच्या निषेधार्ह वाटणाऱ्या घटनेचा त्यांनी चौकामध्ये केवळ फलक लावून निषेध व्यक्त करण्याचा अलिखित निर्णय घेतला.
या घटनेला एकवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत जिल्ह्यात, राज्यात अनेक दंगली झाल्या. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, राष्ट्रपुरुषांची विटंबना, राजकीय नेत्यांचा अवमान, शेतीमालाच्या दराच्या मागण्यांसाठी देशात, राज्यात बंद पाळण्यात आला. मात्र, टाकवडे गावामध्ये या अलिखित निर्णयाचा कधीच भंग केला नाही. त्यामुळे गावच्या डिक्शनरीतून ‘बंद’ हा शब्द हद्दपार झाला आहे.
कोणत्या तरी कारणाने वारंवार गाव, शहर बंद ठेवून सामान्य जनतेला वेठीस धरले जात असल्याने अनेक गावांत, शहरांत टाकवडे गावचा आदर्श घेऊन गावाला बंदमधून वगळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. मात्र, अद्यापही तो टाकवडेइतका कोणत्या गावात अथवा शहरात यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून टाकवडे गावाची ओळख असली तरी ‘बंद’ला रामराम ठोकण्याचा निर्णय आदर्शवत आहे. त्यांचा हा आदर्श इतर गाव व शहरांनी घेण्याची गरज आहे.
विचार करणे गरजेचे
बंदमध्ये प्रथम लक्ष्य सार्वजनिक एस. टी. महामंडळाला केले जाते. यामध्ये पुरुषार्थ वाटत असला तरी याचा अप्रत्यक्ष आर्थिक फटका सामान्य जनतेलाच बसत असतो. शिवाय काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून बंदच्या आंदोलनाचा फायदा उठवत निरपराधांची लूट केली जाते, तर काही ठिकाणी पूर्ववैमनस्याच्या रागातून बंदलाच काळिमा फासला जातो. त्यामुळे बंदसाठी पुढाकार घेणाऱ्यांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.

Web Title: 21 year old tradition of 'Band' free Tavvadei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.