रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून पडू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सोमवारी जिल्ह्यात वीज पडून तिघे जखमी झाले आहेत तर विजेच्या धक्क्याने चार जणांना दुखापत झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सोमवारी झालेले नुकसान असे, दापोली तालुक्यात नानटे येथील ३ व्यक्तींना विजेचा झटका लागून किरकोळ जखमी झाले आहेत. चिपळूण तालुक्यात पेंढांबे येथील मनिषा कदम यांच्या घरावर वीज पडून साक्षी कदम (वय १५ वर्षे), सावरी सुभाष गमरे (वय १५ वर्षे), विजय गमरे (वय ३० वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही जीवित हानी नाही.
संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख येथील दीपक आत्माराम शिंदे विजेचा झटका लागून किरकोळ जखमी झाले आहेत. डिंगणी येथे वीज पडल्याने पिठाच्या गिरणीची मोटार व इतर साहित्य जळून खाक झाले असून अंशत: १० हजाराचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवित हानी नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी कळविले आहे.