रत्नागिरी : होमगार्ड संघटनेत १२ वर्षे स्वयंसेवक म्हणून नाममात्र मानधनावर अहोरात्र सेवा केलेल्या उमेदवारांना सेवेतून मुक्त करावे, या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आमदार राजन साळवी यांनी नाराजी व्यक्त करत थेट गृहराज्यमंत्री राम शिंंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेनंतर या शासन निर्णयाला स्थगिती देण्याचे गृहराज्यमंत्री राम शिंंदे यांनी मान्य केल्याने राज्यासह रत्नागिरीतील शेकडो होमगार्डस्ना दिलासा मिळाला आहे.‘निष्काम सेवा’ हे ब्रीद घेऊन मानवसेवी संघटना म्हणून होमगार्डची ओळख सर्वसामान्यांना आहे. गरीब तसेच सर्वसामान्य घटकातील बहुतांश महिला व पुरुष या संघटनेत गेल्या १५ ते २० वर्षांपासून अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ ४०० रुपयांच्या अत्यल्प मानधनावर कायदा -सुव्यवस्थेसाठी प्रामाणिपणे सेवा करणाऱ्या या महिला व पुरुषांना राज्याबाहेरही विविध निवडणुका, कुंभमेळ्यासारख्या ठिकाणीसुध्दा सेवा बजावावी लागते. तसेच सेवेचे मानधन हे तीन ते पाच महिन्यानंतर प्राप्त होणे, पोशाखाचे कापड, त्याची शिलाईदेखील काहीवेळा स्वखर्चातून द्यावी लागणे, कौटुंबिक समस्येमुळे काही अपवादात्मक वेळी बंदोबस्ताला न आल्यास कारवाईलाही सामोरे जावे लागणे अशा एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत निव्वळ आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे होमगार्ड आपली सेवा बजावत आहेत. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने होमगार्ड संघटनेतील स्वयंसेवकांना पुनर्नियुक्ती देण्याच्या शासन निर्णयांतर्गत १२ वर्षे सेवा झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना सेवेतून मुक्त करण्याचा उफराटा निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो स्वयंसेवकांवर उपासमारीचे संकट उद्भवले असून, यामुळे बेरोजगारीचेही प्रमाण वाढणार आहे. नवीन शासन निर्णयांतर्गत पुनर्नियुक्तीसाठी प्रारंभीची इयत्ता ७ वी उत्तीर्णची अट बदलून ती आता किमान १० वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. पुरुष भरतीसाठी १६०० मीटर धावणे व गोळाफेक तर महिला भरतीसाठी ८०० मीटर धावणे अशा जाचक अटीदेखील घालण्यात आल्या आहेत. शासनाच्या या अविचारी निर्णयाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील होमगार्ड स्वयंसेवकांनादेखील बसला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात ४५० पुरुष व १०० महिला होमगार्ड स्वयंसेवक कार्यरत आहेत. शासनाच्या या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १०० पुरुष व २० महिला होमगार्डना बसणार असून, उर्वरीत स्वयंसेवकदेखील टप्याटप्याने या सेवेतून बाहेर पडणार आहेत. आपली १५ ते २० वर्षांची सेवा संपुष्टात येऊन आपल्यावर उपासमारीसोबत बेरोजगारीचे संकट येणार या भीतीने धास्तावलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच संघटनेच्या राज्यातील काही प्रतिनिधींनी आमदार राजन साळवी यांची याबाबत रत्नागिरी येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी साळवी यांनी संबंधित होमगार्डस स्वयंसेवकांकडून याविषयीची सर्व माहिती घेतली. शासनाच्या या अनावश्यक निर्णयाप्रती नाराजी व्यक्त केली.त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी तत्काळ गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याशी कार्यालयातून दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी होमगार्डस्नी मांडलेल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी या होमगार्डस्च्या सेवेचा विचार करता सेवामुक्तीचा घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राजन साळवी यांनी यावेळी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (प्रतिनिधी)
होमगार्डस्वर सक्तीच्या सेवामुक्तीची तलवार
By admin | Updated: July 1, 2016 23:40 IST