दापोली : शिक्षणाची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समितीने हाती घेतलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात याबाबत जाब विचारून शासनाची झोप उडवणार असल्याचे दापोली, खेड मंडणगडचे आमदार संजय कदम यांनी सांगितले. शिक्षण बचाव समितीतर्फे ‘झोपमोड आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. या आंदोलना दरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय कदम यांच्या घरी भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाकडून संभ्रमावस्था निर्माण करणारे आदेश काढले जात आहेत. यातून शिक्षण क्षेत्राचे अतोनात नुकसान होणार आहे. विधानसभेत याच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. याकरीता लोकप्रतिनिधींना रात्री ११ नंतर झोपेतून उठवून निवेदन सादर करण्याबाबतचे आंदोलन राज्यभर राबवण्यात आले होते. शिक्षण बचाव समितीमार्फत आमदार संजय कदम यांना रात्री ११.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हा प्रश्न शासनदरबारी मांडण्याची विनंती कदम यांना करण्यात आली. सध्याचे शासन ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे. नुसत्या वल्गना करून निद्रीस्त राहण्यात धन्यता मानणाऱ्यांची झोप उडवण्याची वेळ आता आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शैक्षणिक धोरणाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच आवाज उठवू, असे कदम यांनी सांगितले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे कार्यकारणी सदस्य संदेश राऊत, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, सहसचिव किशोर नागरगोजे, सल्लागार शामराव पवार आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अधिवेशनात राज्य शासनाची झोप उडवणार
By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST