दापोली : तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक मंदीचे कारण पुढे करून सामान्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे. या प्रकरणी कामगार युनियनने कर्मचाऱ्यांच्या बाजूने कणखर भूमिका न घेतल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.गेल्या तीन वर्षापूर्वीपासूनचा दिवाळी बोनस, ओव्हरटाईम, फरकाच्या रकमा, प्रमोशन तसेच मागील सहा महिन्यांचा पगार कंपनीने थकवल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाची, घरातील व्यक्तींच्या आजारपणाची, तसेच इतर गरजांची पूर्तता कोठून करायची हा यक्ष प्रश्न कामगारांपुढे आवासून उभा ठाकलेला आहे. मात्र, भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थापन केलेल्या युनियन कमिटीस याचे कोणतेच सोयरसुतक नाही, असे दिसते. गेल्या ३ वर्षांपासून कामगार युनियन कमिटीने कामगारांच्या कोणत्याही समस्या जाणून घेतलेल्या नाहीत. तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. याउलट कामगार कमिटीने कंपनी व्यवस्थापनाशी जवळीक साधून आपल्या स्वत:चे प्रमोशन करून घेतले. तसेच थकीत पगारापैकी आपल्या स्वत:च्या काही रकमा काढून घेतल्या. कामगार कमिटीच्या नावाखाली कमिटी अध्यक्षांनी स्वत:चे नावावरती हाऊस किपिंंगचे कान्टॅ्रक्ट घेऊन लाखो रूपयांचा फायदा करून कामगार बांधवांची फसवणूक केली आहे. एखादा कामगार युनियन कमिटीकडे जाब विचारावयास गेल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कामगारांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कामगार युनियन कमिटीचा बेजबाबदारपणा, त्यांची हुकुमशाही यामुळे कंपनीत अनुचित प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष घालून कामागारांवर होत असणाऱ्या अन्यायाची चौकशी करावी. कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. अन्यथा संतप्त कामागारांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कंपनी प्रशासन, लेबर कमिशन जबाबदार राहतील. या सर्वप्रकाराची संबंधित शासकीय अ$ि$िधकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
‘शिपयार्ड’चे कर्मचारी वाऱ्यावर
By admin | Updated: August 28, 2015 23:41 IST