रत्नागिरी : जिल्ह्याचा १९० गावातील ४९८ वाड्यांचा संभाव पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा १ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. तो आराखडा शासनाने मंजूर केला आहे. मात्र, यंदाचा आराखडा गतवर्षीपेक्षा निम्मा आहे. जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांत भिषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात. या उन्हाळ्यातील टंचाईवर कायमची मात करण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना यंदा मात्र पाणीटंचाई कमी जाणवेल, अशी जिल्हा परिषदेला आशा वाटत आहे. पाणीटंचाई आराखड्यातही यंदा खर्च कमी दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर्षीचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा १ कोटी ७६ लाख रुपयांचा आहे़ या आराखड्यातून विंधन विहिरींची कामे वगळण्यात आली आहेत़ कारण विंधन विहिरींच्या कामे डीपीडीसीमधून घेण्यात आलेली नाहीत. या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील १९० गावातील ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावणार आहे़ त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी १ कोटी ७६ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी १ कोटी १२ लाख ५० हजा रुपये, खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ७० हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे़ जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्याचा टंचाई कृती अराखडा जिल्हा प्रशासनाकडे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर केला होता. तो १ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. (शहर वार्ताहर)
टंचाई कृती आराखडा मंजूर
By admin | Updated: February 28, 2015 23:37 IST