शोभना कांबळे / रत्नागिरी राष्ट्रपिता महात्मा गांधी रत्नागिरीत आले असताना त्यांचे येथील लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने गौरव करून त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा करंडक आजही येथील थरवळ कुटुंबाच्या पाचव्या पिढीपर्यंत जतन करण्यात आला आहे. या करंडकाला उद्या १ मार्च रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधी रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागिरथी निवासात उतरले होते. अर्थात गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्यावतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण १ मार्च १९२७ असा मजकूर लिहिलेला व चरख्याचे चित्र रेखाटलेले होते. त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तुंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. यानुसार महात्मा गांधीजींच्या या चंदनीहाराचा, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव झाला. त्या काळचे रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपत थरवळ यांनी हा सन्मान ५०० रूपयाला विकत घेतला. हे सर्व पैसे स्वातंत्र्यलढ्याला देण्यात आले. उद्या १ मार्च रोजी या घटनेला ८८ वर्षे पुर्ण होत आहेत. या भेटीपासून गणपत थरवळ आणि त्यांचे दोन मुलगे मुकुंद व विश्वनाथ थरवळ देशभक्तीने भारावलेले होते. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. तर मुकुंदराव यांनी रत्नागिरीतील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यांचे द्वितीय पुत्र सुभाष थरवळ यांच्याकडे सध्या हा करंडक जतन केलेला आहे. (प्रतिनिधी)
तब्बल ८८ वर्ष जपलीय गांधीजींची ‘ती’ आठवण
By admin | Updated: February 28, 2015 23:43 IST