रत्नागिरी : कृषी विभाग आणि भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएल यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली महाकृषी संचार योजना २१ आॅक्टोबरला बंद झाली असली तरी येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना नव्या आकर्षक रूपात पुन्हा ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. आत्तापर्यंत आलेल्या तीन योजनांचे एकत्रीकरण असे या योजनेचे स्वरूप असल्याचे बीएसएनएल सुत्रांकडून सांगण्यात आले. कंपनीपासून दूर चाललेल्या ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनी विविध योजनांचा अवलंब करत आहे.कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामधील संवाद वाढावा, त्यांच्यात कमी खर्चात व सवलतीच्या दरात समन्वय साधला जावा, या हेतूने मोबाईल टू मोबाईल ही ‘महाकृषी संचार’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाण्यांची उपलब्धता व गुणवत्तेबाबत येणाऱ्या अडचणी तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तत्काळ व कमी खर्चात मिळावी यासाठी ‘क्लोज युजर ग्रुप’ (सीयुजी) भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यासाठी विनामूल्य सुविधा, नेटवर्क आणि गुणवत्ता यांचा विचार करून बीएसएनएलची निवड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तीन टप्प्यांत कृषीसंचार योजना सुरू करण्यात आली. या तीनही वेळा ही योजना यशस्वी झाल्याने आता या तीनही योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना नव्या स्वरुपात येत आहे. पहिल्या तीन व आता नव्या योजनेतील शेतकरी एकमेकांशी मोफत बोलू शकणार आहेत. मात्र, लाभाचे व रिचार्जचे स्वरूप या योजनेत बदलले जाणार आहे. एक नोव्हेंबरला हा नवा प्लॅन सुरु होणार असून, ३१ मार्चपर्यंत शेतकरी सीम खरेदी करू शकतील. नव्या स्वरूपानुसार सर्व प्रीपेड ग्राहकांना १४१ तर पोस्टपेड ग्राहकांना १२४ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. यात सर्व ग्रुपमधील ग्राहक एकमेकांशी अनलिमिटेड मोफत संभाषण करू शकणार आहेत, अशी माहिती बीएसएनएलच्या सुत्रांनी दिली आहे.तसेच बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ४०० एमबी इंटरनेट डाटा मोफत तसेच ४५० कॉल्स मोफत मिळणार आहेत. तर इतरांसाठी ५० कॉल मोफत मिळणार आहेत. बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ४०० तर इतरांसाठी १०० संदेश देखील यात मिळणार आहेत. त्यामुळे तीन योजनांचे एकत्रीकरण असलेली ‘थ्री इन वन’ महाकृषी संचार योजना येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने नवी सुरू केलेली योजना शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट ठरणार आहे. (प्रतिनिधी)फायदा : विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांना वगळलेविविध मोबाईल कंपन्यांनी विविध ग्रुप योजना सुरू केल्या. मात्र, शेतकरी हा एकमेव घटक यातून वगळला होता. त्यामुळे बीएसएनएल व शासनाच्या कृषी विभाग यांच्या सहकार्याने फक्त शेतकऱ्यांसाठी ‘कृषीसंचार’ ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक सुविधा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे याआधीच्याही तीनही योजना लोकप्रिय झाल्या आहेत. आतापर्यंत ९९, १०८, १०९, १२८ रुपये मासिक भाडे असलेली ही योजना बीएसएनएलने तीन टप्प्यात सुरु केली आहे. यामुळे या योजनेचे लाभार्थी शेतकरी व अधिकारी एकमेकांशी मोफत बोलत आहेत. फक्त या तीन टप्प्यांतील ग्राहक आपला ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये मोफत संभाषण करू शकत नव्हते. मात्र, नव्या योजनेत एका ग्रुपमधील सदस्य दुसऱ्या ग्रुपमधील सदस्याशी मोफत संभाषण करू शकतील.बीएसएनएलच्या सर्व योजनांपेक्षा सर्वाधिक लोकप्रिय आणि मागणी असणारी अशी ही ‘कृषी महासंचार योजना’ आहे. यात आता सर्व योजनांचे एकत्रीकरण झाल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेचे नवे स्वरूप ग्राहकांना कमी खर्च करायला लावणारे आणि ग्राहक वाढवण्यास मदत करेल.
महाकृषी संचार योजनेला ‘रेंज’
By admin | Updated: October 25, 2015 23:31 IST