लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : चिखलात उतरून भाताची रोपे लागवड करण्याबरोबर, नांगरणी करताना बैल हाकण्याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी घेतला. निवळी येथे कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी केवळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा आनंद अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी घेतला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून निवळी येथे कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, कृषी समिती सभापती रेश्मा झगडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण समिती सभापती परशुराम कदम, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग, सरपंच वेदिका रावणंग, उपसरपंच विलास गावडे, तसेच नारळ संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. वैभव शिंदे, भात संशोधन केंद्र शिरगाव संशोधन अधिकारी विजय दळवी, जिल्हा अधीक्षक उर्मिला चिखले, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना मसाल्याच्या झाडांची लागवड, भात पिकाच्या लागवडीतील चारसूत्री पद्धत, भात पीक लागवड प्रात्यक्षिकाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी गतवर्षी भात पीक स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. वैभव शिंदे यांनी भाजीपाला लागवड व मसाला पिके लागवड याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संशोधन अधिकारी विजय दळवी यांनी भात लागवड करताना घ्यावयाची काळजी, तसेच नागली पिकाचे महत्त्व व फायदे विषद करून लागवडीत येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग ग्रामपंचायत निवळी यांच्या संयुक्त विद्यमाने व पाली मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.