चिपळूण : चिपळूणच्या पुरमुक्तीबाबत उपाययोजना राबविण्यात शासनाला रस नाही. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी केवळ १० कोटी रुपयांचे गाजर दाखवून चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केवळ फसविण्याचा धंदाच सुरू ठेवला आहे. गाळाविषयी सरकार गंभीरतेने दखल घेत नाही. ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारला लगावला.चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ११ व्या दिवशी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. उपोषणाकर्त्यांचे म्हणणे एैकून घेतल्यानंतर यविरोधात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कापसाळ विश्रामगृह येथे आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लाड म्हणाले, वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याची चिपळूणवासीयांची मागणी रास्त आहे. वाशिष्ठी नदीत ३ लाख ३० हजार घनमिटर गाळ काढण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी कागदोपत्री ७० हजार घनमिटर गाळ असल्याचे सांगतात. शासकीय विभागात एकमेकांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. गाळ काढण्यासाठी ३०० कोटींची मागणी असताना केवळ १० कोटीचा निधी मंजूर होतो. ही लच्छनास्पद बाब आहे. जिथे जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे लोकांवर अन्याय होत आहे. येत्या ५ महिन्यात दोन्ही नद्यातील गाळ न काढल्यास पुन्हा चिपळूणात पुरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येतात, देवदर्शन घेतात. मात्र त्यांना उपोषणाचे काही देणे घेणे नाही. दोन दिवस जिल्ह्यात असतानाही त्यांनी चिपळूणकरांच्या उपोषणाला भेट देण्याचे टाळले आहे. खासदारांना तर गाळातलं काय कळतच नाही. उपोषणापर्यंत आमदार भास्कर जाधवांचे नेटवर्क पोहोचत नाही. यामुळेच चिपळूणकरांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशनात भाजपच्या वतीने आवाज उठवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. चिपळूणकरांच्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे आश्वासन लाड यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष विनोद बोभसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरेसवक विजय चितळे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते.फडणवीस, दरेकर चिपळूणच्या आंदोलनात उतरतीलआमदार म्हणून नव्हे, तर कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या आंदोलनाकडे पाहत आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही या आंदोलनाची दखल घेतली आहे. लवकरच ते या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी दोघेही येत्या हिवाळी अधिवेशनात चिपळूणच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडतील. त्याची प्रक्रिया त्यांनी सुरूही केली आहे.
ठाकरे सरकारने चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली, प्रसाद लाड यांचे टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:46 IST