शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण चार लाख कोटींच्या प्रकल्पाला मुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे नाणारमधील अस्तित्त्व धोक्यात आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे नाणारमधील अस्तित्त्व धोक्यात आले आहे. शिवसेनेने केलेला अट्टाहास, अपुऱ्या माहितीवर काही लोकांची झालेली दिशाभूल आणि प्रकल्प काय आहे हे समजूनच न घेता झालेला विरोध यामुळे जिल्हा किंवा कोकणच नाही तर राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देऊ शकणारा प्रकल्प हातचा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेली जवळपास पाच वर्षे रिफायनरी प्रकल्प वादाच्याच भोवऱ्यात आहे. जुलै २०१७मध्ये शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठीची अधिसूचना काढली. ऑगस्ट २०१७मध्ये विरोधाचा पहिला मोर्चा काढण्यात आला. हा प्रकल्प विनाशकारी आहे, असे ग्रामीण भागातील लोकांच्या मनात ठसवण्यात आले. त्यामुळे भूमिपुत्र बिथरले. हळूहळू विरोधाची धार तीव्र झाली. हे चित्र पाहून प्रकल्पाची अधिसूचना काढण्याऱ्या शिवसेनेने उलट बाजू घेत प्रकल्पाला विरोध करायला सुरूवात केली. हा प्रकल्प विनाशकारी आहे, असे खासदार विनायक राऊत यांच्यापासून शिवसेनेचे सगळेच सदस्य सांगू लागले.

इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन २२ सप्टेंबर २०१७ रोजी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. ही कंपनी स्थापन केली. नैसर्गिक बंदर लक्षात घेऊन विजयदुर्ग व राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरात हा प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले. या प्रकल्पामुळे राज्याचा जीडीपी १० ते १५ टक्क्यांनी तर देशाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. अमेरिका, सौदी अरेबिया, कॅनडा येथून दरवर्षी ६० दशलक्ष मेट्रिक टन इतके कच्चे तेल आणून या तेलापासून इंधन बनवणे असा हा प्रकल्प होता. पण त्याबरोबरच पेट्रोकेमिकल्सवरही मोठा भर दिला जाणार होता. रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशात प्रथमच एकत्र उभे राहणार होते. असे झाले असते तर पेट्रोकेमिकल्सशी निगडीत असंख्य व्यवसाय या भागात नव्याने उभारले गेले असते.

प्रकल्पाच्या सकारात्मक बाजूंचा विचार न करताच शिवसेनेने केलेला ठाम विरोध या प्रकल्पाच्या मुळावर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ साली हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा तेव्हाच्या युती सरकारने केली. आता प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेनाच सत्तेत आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाणारमध्ये होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता कंपनी राजापूर तालुक्यातच अन्य जागांचा विचार करत आहे. विनाशकारी असा शिक्का मारुन तेथेही असाच प्रतिसाद दिला गेला तर हा प्रकल्प अन्य राज्यात नेला जाणार आहे.

काय होती शक्यता

प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना दीड लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळेल आणि काम पूर्ण झाल्यानंतर २० हजार लोकांना थेट रोजगार मिळेल, असा कंपनीचा दावा होता. कंपनीसाठी काम करणाऱ्या लोकांमुळे राजापूर तालुक्याचा व्यवसाय वाढला असता आणि या गरजा भागवणाऱ्या क्षेत्रांमध्ये आपोआपच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या असत्या. प्रकल्पाच्या अनुषंगाने वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, बंदर सुविधा आणि हवाई जोडणीच्या विकासाला संधी होती. शैक्षणिक विकासाला संधी होती.

...................

म्हणे लोकांच्या बाजूने

आम्ही लोकांच्या बाजूने आहोत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. प्रकल्प विरोधकांच्या मांडीला मांडी लावून शिवसेनेने त्यांच्याशी चर्चा केली. पण ज्यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्प हवाय, असे म्हणणारे लोक उभे राहिले, तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याकडून साधे निवेदनही घेतले नाही. प्रकल्प हवाय असे म्हणणाऱ्यांमध्ये प्रकल्प परिसरातील लोकांसह राजापूर तालुक्यातील म्हणजेच महाराष्ट्राचे नागरिक असलेले लोकच होते. पण या लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदीही शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली नाही.

......................

विकासाला मर्यादा

पर्यटन, कृषी या माध्यमातून विकास करण्याला मर्यादा आहेत. त्याबाबतही पूर्ण झुकते माप देऊन विचार केला जात नाही. त्यासाठी गरजेच्या गोष्टी होत नाहीत. गेली २०, २५ वर्षे पर्यटनातून विकास, फलोत्पादनातून विकास अशा घोषणा होत आहेत. मात्र, आजही लाखो रत्नागिरीकर जिल्ह्यात संधी नाही म्हणून मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात मिळेल ती नोकरी करत आहेत.

...................

इथे नको तर नेणार कोठे?

राजापूर तालुक्यातच बारसू परिसरात प्रकल्प उभारण्यात कंपनीला स्वारस्य आहे, अशी माहिती पुढे येत आहे. पण शिवसेनेला हा प्रकल्प विनाशकारी वाटत असेल तर बारसूमध्ये तरी हा प्रकल्प करण्याला परवानगी दिली जाईल का, असा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्यात होण्याची शक्यता आता दुरापास्त होत चालली आहे. महाराष्ट्र व्हीजन टूमध्ये १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे प्रकल्प येणार म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्यांना ४ लाख कोटींचा प्रकल्प हातचा जात आहे, याचे दु:ख वाटत नाही का?