प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी रत्नागिरी पालिकेच्या फिरतीवरील कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेकडून त्यांना जीपीएस संच सोबत ठेवणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. शहरातील विविध प्रकारची कामे योग्य वेळेत व्हावीत, त्यात कोणी कामचुकारपणा करू नये व नागरिकांना वेळीच सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा जीपीएसचा रिमोट वापरला जाणार असून, त्यात संबंधित कर्मचाऱ्यांबाबत तीन महिन्यांपर्यंतचा तपशील साठवण्याची क्षमता राहणार आहे. एका खासगी कंपनीमार्फत ही योजना राबवण्याचा विचार पालिकेतील कारभाऱ्यांमार्फत सुरू आहे. जीपीएस संचाची पाहणी व त्यांच्या वापराबाबतची प्राथमिक चर्चाही झाली आहे. पालिकेच्या पंधरा घंटा गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. हे जीपीएस यंत्रणेचे सेट्स अधिक क्षमतेचे असणार आहेत. पालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या शहराच्या विविध भागात दररोज जातात. मात्र, घंटागाडी आपल्या भागात आलीच नाही, अशा तक्रारी नागरिकांकडुन केल्या जातात. त्यामुळे कचरा गाड्या कोठे आहेत, कोठे किती वेळ थांबल्या, पालिका क्षेत्राबाहेर कुठे गेल्या का? यावर जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच अनेकवेळा मुकादम साफसफाई होत असलेल्या ठिकाणी नसतात, अशा तक्रारीही नागरिकांतून करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवरही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. घंटा गाड्यांवरील जीपीएसची चर्चा होत असतानाच पालिकेतील काही कर्मचारीही सातत्याने शहरातील कामांसाठी पालिकेबाहेर असतात. त्यामुळे त्यांनाही आॅडिओ कॅसेटच्या आकाराचे हे जीपीएस संच देण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. हे जीपीएस संच ज्याप्रमाणे ओळखपत्र लेसदवारे गळ्यात घातली जातात त्याप्रमाणेच जीपीएस संच गळ्यात घालणे शक्य होणार आहे. पालिकेतील आरोग्य व स्वच्छता विभागाचे निरीक्षक, उद्यान पर्यवेक्षक, आरोग्य विभागाचे मुकादम, करवसुली कर्मचारी, पाणी पुरवठा विभागाचा शहराच्या विविध भागात काम करणारे कर्मचारी, शहरातील विकासकामांच्या निरीक्षणासाठी सातत्याने जाणारे काही अभियंतेही या जीपीएसच्या छत्राखाली येण्याची शक्यता आहे. दर्जानुसार सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये किंमत असलेल्या या जीपीएस संचामध्ये मोबाईलचे सीमकार्ड असणार आहे. त्याद्वारे पालिकेतील अधिकारी, पदाधिकारी यांना तत्काळ जीपीएस संचधारक कर्मचारी, अधिकाऱ्यांशी मोबाईलप्रमाणे बोलणे, सूचना देणे शक्य होणार आहे, तर कर्मचाऱ्यांनाही या संचाद्वारे आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. या संचामुळे संबंधित कर्मचारी कोणत्या प्रभागात कुठल्या ठिकाणी आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना मिळणार आहे. हा संच गळ्यातून काढून ठेवल्यास त्यानंतर दहा मिनिटांनी संचातून मोठा आवाज येणे सुरू होईल. त्यावरून कोणत्या कर्मचाऱ्याने हा संच काढून बाजुला ठेवला आहे, हे समजणार आहे. या संचाच्या किमतीमध्येच वर्षभरासाठी मोबाईल सीमकार्डचा खर्च, वर्षभराची सेवा संबंधित कंपनीकडूनच दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षाच्या सेवेसाठी कमी खर्च येणार आहे. रत्नागिरी पालिकेतील कर्मचारी त्यांच्या विभागात काम करताना वेळकाढूपणा तर करीत नाहीत ना, बाहेर किती वेळ जातात. जेवणासाठी कितीवेळ बाहेर राहतात, यासारख्या अनियमितता दूर करण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सर्वच विभागात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तळमजल्यापासून ते तिसऱ्या मजल्यापर्यंत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे कामकाजात बऱ्यापैकी सुसूत्रता आली आहे. आता बाहेर काम आहे म्हणून कार्यालयातून जाणाऱ्या कर्मचारी, काही अभियंते, स्वच्छता निरीक्षक तसेच अन्य काही विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रतेसाठीच जीपीएस संच देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या गळ्यातही जीपीएस संच !
By admin | Updated: August 23, 2015 23:33 IST