रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या ४ नगसेवकांनी अपात्रतेविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १ सप्टेंबरला निर्णय होणार आहे. मात्र, त्याआधीच मतदार यादीच्या अधिसूचनेनुसार पोटनिवडणुकीचा ‘घंटानाद’ झाल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. पोटनिवडणूक कधी होणार हे चित्र धुसर असले तरी इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू असून, ते तयारीलाही लागले आहेत. त्यामुळे ‘समुद्रात मासे व चुलीवर आधण’ अशी स्थिती रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात दिसत आहे.रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीच्या वेळी राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादीच्या सहापैकी चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीने पक्षादेश धुडकावत सेनेचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय साळवी यांना मतदान केले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एका पक्षातून बाहेर पडल्यानंतर संबंधित सदस्यांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हावे लागते. त्यामुळे स्वतंत्र गट करणाऱ्या या चारही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा मागणी अर्ज राष्ट्रवादीचे प्रतोद सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. जिल्हाधिकाऱ्यांंनी स्मितल पावसकर, दत्तात्रय साळवी, प्रीती सुर्वे व मुनीज जमादार या चारही जणांना अपात्र ठरविले होते. या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका २९ जुलै २०१५ रोजी दाखल केली.याचिकेचा निर्णय होईपर्यंत ही चारही नगरसेवकपदे राजपत्रात रिक्त झाल्याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी करू नये, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २० आॅगस्ट २०१५ रोजी दिला आहे. मात्र, त्याआधीच या जागा रिक्त झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे गेल्याने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७६ नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक व अन्य नगरपरिषदांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम २४ आॅगस्ट २०१५ रोजी जाहीर केला आहे. ही अधिसूचना जाहीर झाल्याने मतदार यादीच्या कामाला रत्नागिरीतील प्रभाग २ व ४ मध्ये सुरुवात झाली आहे. यामुळे अपात्र झालेले चार नगरसेवक धास्तावले आहेत, तर ज्यांना या दोन्ही प्रभागातून पोटनिवडणूक लढवायची आहे, असे बाशिंग बांधलेले अनेकजण उमेदवारीच्या गॅलरीत रांगा लावून आहेत. काही विद्यमान नगरसेवकांच्या वारसदारांचाही त्यात समावेश आहे. अनेकजण निवडणुकीच्या जोरदार तयारीलाही लागले आहेत. या निवडणुकीत युती झाली तर दोन जागा सेनेला मिळू शकतील. दोन जागांवर राष्ट्रवादी हमखास विजयी होईल, असाही अंदाज आहे. प्रभाग २ व प्रभाग ४ मध्ये प्रत्येकी २ प्रमाणे नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होऊ शकते. मात्र, ही निवडणूक होणार की नाही, हे न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार असल्याचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)निवडणूक आयोगाचे निर्देश स्पष्ट...राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीबाबत जी अधिसूचना जारी केली आहे, त्यामध्ये निवडणुकीबाबत काही निर्देश स्पष्टपणे दिलेले आहेत. त्यानुसार ‘मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एखाद्या नगरपरिषदेच्या, नगरपंचायतीच्या किंवा रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीबाबत न्यायालयाचे, शासनाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास सदर पदाच्या मतदार यादीचा कार्यक्रम रद्द करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आयोगाला तत्काळ सादर करावा,’ असे स्पष्ट आहे. या निर्देशानुसार १ सप्टेंबरच्या उच्च न्यायालयातील सुनावणीत निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
मासे समुद्रात अन् चुलीवर ठेवले आधण!
By admin | Updated: August 28, 2015 23:25 IST