जिल्ह्यात साडेआठ टक्के लोकांची दारिद्र्यरेषेखालील नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:01+5:302021-07-30T04:34:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : २०११ साली देशाची जनगणना झाली. त्यावेळी विविध प्रकारच्या गटानुसार जनगणना झाली. मात्र, त्यानंतर अजूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : २०११ साली देशाची जनगणना झाली. त्यावेळी विविध प्रकारच्या गटानुसार जनगणना झाली. मात्र, त्यानंतर अजूनही जनगणना न झाल्याने आहे त्याचप्रकारे लोकसंख्या विविध बाबींसाठी ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची यादीही अद्याप सुधारित करण्यात न आल्याने पूर्वीचीच यादी वापरली जात आहे. त्यामुळे या यादीत काही सधन व्यक्तिंचा समावेश असूनही त्यांना शासनाच्या योजनेचे लाभ मिळत आहेत. मात्र, खरे गरजू या लाभापासून वंचित राहात आहेत.
जिल्ह्यात ३८,५५७ रेशनकार्डधारकांचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत करण्यात आला आहे. या रेशनकार्डवरील ३ लाख ३६ हजार ६९५ लोकांचा समावेश २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील यादीत असल्याने त्यांना शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा तसेच सध्या काेरोना काळात मोफत धान्याचा लाभ मिळत आहे.
परंतु यापैकी काही जण सधन असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याने खऱ्या गरजूंना शासनाच्या मदतीचा लाभ मिळताना अडचणी येत आहेत.
दारिद्र्यरेषेखालीलसाठीचे निकष कोणते?
व्यक्तीचे उत्पन्न २१ हजाराच्या आत असेल तर त्या व्यक्तिचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश करता येतो.
निराधार व्यक्तिचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत होतो.
त्यासाठी महसूल विभागाकडून दर पाच ते दहा वर्षांनंतर सर्वेक्षण होत असते.
महसूल यंत्रणेकडून होणाऱ्या या सर्वेक्षणात सिद्ध झाल्यास त्या व्यक्तिला प्रमाणपत्र दिले जाते.
हे प्रमाणपत्र घेऊन तहसील कार्यालयात गेल्यास त्या व्यक्तिचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत करून पिवळे रेशनकार्ड दिले जाते.
दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला गेला नाही
दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची यादी अपडेट करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दर पाच वर्षांनी आढावा घेतला जातो.
२०११ साली राष्ट्रीय जनगणना झाली. त्यानंतर अजूनही जनगणना न झाल्याने आहे तीच यादी वापरली जात आहे.
यादीत गोंधळ कारण...
दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश होणाऱ्यांचे उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, काही घरात अनेक माणसे कमावती असली तरीही त्यांच्या रेशनकार्डवर २१ हजारपेक्षा कमी उत्पन्न दाखविले जाते आणि ज्याचे उत्पन्न कमी असले तरीही ते जास्त दाखविले जात असल्याने गरजवंत वंचित राहात आहेत.
कोण गरीब, कोण श्रीमंत? साडे अडतीस हजार लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ
जिल्ह्यात ३८ हजार ५५७ लोकांकडे दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असल्याने त्यांना पिवळ्या रंगाचे रेशनकार्ड देण्यात आले आहे.
काहींनी बनावट कागदपत्रे सादर करून आपले नाव या यादीत समाविष्ट करून घेतले आहे.