पर्यटकांवर अवलंबून असलेल्यांची बिकट अवस्था
लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्यानंतर पर्यटक मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे ६,५०० पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत, परंतु या वर्षीही गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे गेला महिनाभर बंद असलेल्या तालुक्यातील हॉटेल, लॉज च घरगुती राहण्याच्या ठिकाणांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
पूर्वी गुहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक गेल्या वर्षीचा कोरोना काळ वगळता, आता सलग तीन दिवस वास्तव्य करू लागला आहे. एवढेच नव्हे, तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोईसुविधामुळे शक्य झाले आहे. गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. बहुचर्चित एरॉनचा दाभोळ पॉवर प्रकल्प बंद पडल्यानंतर बेरोजगारीचे मोठे संकट तालुक्यावर आले होते. अशा परिस्थितीत निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे हा तालुका पर्यटन व्यवसायावरच जास्त अवलंबू आहे.
कोरोनाच्या संकटामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले समुद्रातील बोटिंग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉल अन्य लहान व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी सोईसुविधा निर्माण करून देण्यासाठी बँकेतून घेतलेले कर्ज फेडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारही हवालदिल झाले आहेत. पर्यटक आलेच नाही, तर रोजगार कसा मिळणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
....................................
तालुक्यातील हेदवी - नरवण गावात ६ हॉटेल, ४ एमटीडीसी निवासस्थाने, वेळणेश्वरमध्ये निवासस्थाने ४, शृंगारतळीत ६ हॉटेल, २ एमटीडीसी निवासस्थाने, २ परमिट बार, वेलदूर - अंजनवेल येथे ३ हॉटेल, ३ एमटीडीसी निवासस्थान, गुहागर शहरात २० हॉटेल, काही गावांसह तालुक्यात सुमारे ४५ हॉटेल, ३० एमटीडीसी निवासस्थाने व ५८ घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे.
...........................................
कोरानाचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योगधंदे, हॉटेल व्यावसायिक व आंबा-काजू बागायतदारांवर झाला आहे. पुढील १० वर्षे मागे गेल्यासारखे होणार आहेत. लाखोंची उलाढाल अचानक थांबल्याने कामगार व कर्मचारी यांच्या रोजगारापुढे आव्हान उभे राहिले आहे, तर ज्यांचे हातावर पोट आहे, अशांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- श्यामकांत खातू, अन्नपूर्णा हॉटेल