रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी तेथील किनाऱ्यावर असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. या मोहिमेबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यामुळे सर्वच लोकांनी आपले सामान तेथून हलवले होते.
मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय विभाग या बंदराचा विकास करणार आहे. गेली अनेक वर्षे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे असल्याने या बंदरातील विकास कामे थांबली होती. मात्र आता राजकीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आणि बंदर विकासाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे किनारपट्टीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला आहे.
23 जानेवारीला ही कारवाई केली जाणार होती. मात्र आम्हाला सामान हलवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी आणि वेळ द्यावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली असल्याने कारवाई तीन दिवस पुढे ढकलण्यात आली. सामान हलवण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार 27 रोजी बांधकामे हटवण्यात येतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत असलेली ठाम भूमिका पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी तीन दिवसात आपले सामान हलवले आहे.
सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पडण्यास सुरुवात झाली आहे. किनारपट्टी पूर्ण मोकळी झाल्यानंतर मिरकरवाडा विकास आराखड्यानुसार तातडीने काम सुरू केले जाणार आहे.