रत्नागिरी : जिल्ह्यात ६४ गावांतील १०६ वाड्यांमधील टँकर्सग्रस्तांना १३ टँकर्संनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण आहेत. टंचाईग्रस्त गावांमुळे जिल्ह्यात १३,१४० लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यातच कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने पाण्यासाठी हाल होत आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा मोठा समावेश आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांना पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत. कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले, विंधन विहिरी आटल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावली आहे. या टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना शासनाची दमछाक होत आहे. लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.
जनावरांची पाण्यासाठी तडफड
टंचाईग्रस्त गावांना शासकीय ३ आणि खासगी १० अशा केवळ १३ टँकर्संनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. जिल्ह्यात प्रशासनाकडून केवळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. त्यामुळे इतर वापरासाठी पाणी आणण्यास डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागत आहे.
टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर...
तालुका गावे वाड्या टँकर
मंडणगड ०५ ०६ ०१
खेड १९ ३५ ०५
चिपळूण १२ १४ ०१
संगमेश्वर १७ ३६ ०२
रत्नागिरी ०२ ०६ ०१
लांजा ०७ ०७ ०१
राजापूर ०२ ०२ ०१
एकूण-- ६४ १०६ १३