रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १०२३ नव्या काेरोना रुग्णांची भर पडली असून, सात पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३७,४६२ एवढी झाली असून, आतापर्यंत १२४७ जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या गेल्या २४ तासांच्या अहवालानुसार मंगळवारी ६५५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले, तर मागील ३६८ प्रलंबित चाचण्यांचे अहवालही प्राप्त झाले. त्यामुळे एकाचदिवशी १०२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे; तर ५०७ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता ३२,२९० इतकी झाली आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली असली, तरीही मृत्यू होणाऱ्यांच्या टक्केवारीतही वाढ होत आहे. मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात राजापूर तालुक्यातील तीन, चिपळूण दोन आणि रत्नागिरी, लांजा तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत ३१०५ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत.