रत्नागिरी : अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांतील वस्त्यांमधील विकास कामांसाठी शासनाने १ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील दोन वर्षे पडून असलेल्या या विकासकामांचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आता अल्पसंख्याक बहुल वस्त्यांमध्ये विकासकामे लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा देऊन तेथील ग्रामस्थांचा जीवनमानाचा दर्जा उंचावणे, या उद्देशाने शासनाकडून हा विकासनिधी वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल असलेल्या वस्त्यांचाही विकास व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी शासनाकडे विकासकामांचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडला होता. याप्रमाणे इतर जिल्ह्यांतील अल्पसंख्याक बहुल वस्त्यांचेही प्रस्ताव शासनाकडे आले होते. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करणे, रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे, पाखाडी बांधणे, निवारा शेड बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, गटार बांधणे, रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, आदी विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. इतर समाजासह अल्पसंख्याक समाजातील वस्त्यांचाही विकास व्हावा, यासाठी शासनाने हे प्रस्ताव मागविले असतानाही हे प्रस्ताव पडून असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष माने यांच्या लक्षात येताच त्यांनी यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर या विकासकामांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी शासनाने निधी दिला असून, तो जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींमार्फत तो खर्च करण्यात येणार आहे. लवकरच ही कामे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक वस्त्यांमधील गेली अनेक वर्षे रखडलेली रस्ते डांबरीकरण, खडीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने अल्पसंख्याक समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)
अल्पसंख्याक वस्त्यांना १ कोटी
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST