- जयंत धुळपप्रकल्पांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या रायगडवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितीही झुंजत असली, तरी येथील स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.चारवेळा निवडून आलेले अनंत गिते यांना प्रस्थापितांविरोधी नाराजीचा सामना करावा लागतो आहे. मागील निवडणुकीत त्यांना दिलेला पाठींबा काढून घेत निसटता पराभव पत्करावा लागलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासोबत यावेळी शेकाप आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी, त्यांच्या नेत्यांशी पूर्वी असलेले वाद मिटवले आहेत.रायगडमध्ये आलेले किंवा येऊ घातलेले प्रकल्प, त्यातील विस्थापित, रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, जलवाहतूक किंवा बंदरांचे प्रश्न यापैकी एकही मुद्दा ठळकपणे प्रचारात नाही. मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा काही प्रमाणात सभा गाजवतो, पण तेवढ्यापुरताच. गीतेंनी तटकरेंच्या कथित भ्रष्टाचारावर प्रचारात भर दिला आहे, तर तटकरेंनी गीतेंच्या निष्क्रियतेवर. मंत्रीपद असूनही गीते एकही मोठा उद्योग किंवा प्रकल्प आणू न शकल्यावर आणि त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटत नसल्यावर त्यांचा भर आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जो भाग या मतदारसंघात येतो, तेथे फळबागायतदारांचा प्रश्न काहीसा चर्चेत येतो. त्यामुळे प्रचारात ठोस मुद्यांचा अभाव आहे. खासदारांची कामे, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, केंद्र सरकारची कामगिरी- तेथून जिल्ह्याला काय मिळाले, यासारखे मुद्दे गौण होत वैयक्तिक हेवेदावे, उमेदवारांची क्षमता-दर्जा याभोवती भाषणे फिरताना दिसतात.
शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:02 IST