- राजेश भिसेनागोठणे : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पनवेल ते सुकेळी हा मार्ग मे महिन्यापर्यंत चालू होण्याचे संकेत असून मे महिना लक्ष्य असल्याचे अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.साधारणत: १० ते १२ वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. सन २०१४ पर्यंत पूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होईल, असे शासनाकडून त्या वेळी सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात, जागा संपादित करणे, कर्नाळा खिंडीतील वृक्षराजी तसेच इतर कामांसाठी अडथळे येत होते व त्यामुळे प्रदीर्घ कालावधी लागत असल्याने संबंधित ठेकेदारांना २०२० साल उजडूनही रस्ता पूर्णत्वास नेण्यात अपयश येत होते. त्या वेळी पनवेल- पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे कामाचे दोन टप्पे तयार करून ते दोन ठेकेदारांना देण्यात आले होते. मात्र, कामात दिरंगाई होत असल्याने कासू ते इंदापूर या मार्गातील खारढोंबी ते सुकेळी खिंडीच्या अलीकडच्या भागापर्यंतचे काम दोन वर्षांपूर्वी पनवेलच्या जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे देण्यात आले. या मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू असल्याने पनवेल ते सुकेळी हा नवीन महामार्ग मे महिन्यापर्यंत वाहतुकीस खुला होईल, असे सूत्रांनी सांगितले.पनवेल ते सुकेळी या मार्गात इतर लहान पुलांबरोबर खारपाडा, पेण, निडी, वाकण आदी ठिकाणी मोठे पूल आहेत. पेण आणि निडी येथील पुलांवरून सध्या वाहतूकसुद्धा चालू करण्यात आली असून, खारपाड्याचा पूलसुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. वाकणचा पूलसुद्धा दृष्टिक्षेपात आला असल्याने महिनाभरात तो पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले. पळस येथील माती भरावाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे व १५ फेब्रुवारीपासून हा नवीन रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल, असे सांगण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात, रस्ता मे महिन्यापर्यंत वाहतुकीस सुरू होण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 01:28 IST