मोदी सरकारच्या निर्णयामुळे तारांबळ
By Admin | Updated: November 10, 2016 03:40 IST2016-11-10T03:40:55+5:302016-11-10T03:40:55+5:30
मंगळवारी ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारांतून रद्द केल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यावर जनसामान्यांची मोठी तारांबळच उडाली होती.

मोदी सरकारच्या निर्णयामुळे तारांबळ
अलिबाग : मंगळवारी ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारांतून रद्द केल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यावर जनसामान्यांची मोठी तारांबळच उडाली होती. जिल्ह्यातील २५ विविध बँकांच्या ६६३ एटीएम मशिन्समधून जास्तीतजास्त वेळा एटीएम कार्ड वापरुन प्रत्येक वेळी ४०० रुपये याप्रमाणे १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात पैसे काढून घेण्याचा प्रयत्न सर्वत्रच झाला आणि त्याच वेळी रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांचा संयम अनेक ठिकाणी सुटला. यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी येवून वादावादी मिटवण्याचे काम करावे लागले.
मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत खातेदारांनी १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात रकमा काढून घेतल्याने जिल्ह्यातील सर्व म्हणजे ६६३ एटीएम मशीन्समधील १०० रुपयांच्या नोटा पूर्णपणे संपल्या असल्याचे विविध बँकांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी व गुरुवारी बँका आणि एटीएम मशीन्स असे दोन्ही एकाचवेळी बंद राहाण्याच्या परिस्थितीस सामोरे जाताना बँक खातेदारांमध्ये अस्वस्थतेसह संतापाची देखील भावना दिसून येत होती. एटीएम मशीन्समधील ५०० व १००० रुपये मूल्याच्या रद्द झालेल्या नोटा काढून त्याऐवजी १०० रुपये मूल्याच्या आणि त्यात मुळात होत्या पण मंगळवारी रात्री पूर्णपणे संपलेल्या अशा रिक्त जागी १०० रुपये मूल्याच्याच नोटांचा भरणा करावा लागणार आहे. शुक्रवारी बँका आणि एटीएम मशीन जरी सुरु झाले तरी १०० रु.च्या नोटांच्या पुरवठ्या अभावी एटीएम मशीन्स चालणार कशी अशी चिंता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नऊ एटीएम मशीन्स असून बँकेच्या शाखांच्या आर्थिक व्यवहाराकरिता सुमारे ४ कोटी रुपये दररोज लागतात. अशाच प्रकारची परिस्थिती राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही आहे. त्यावर परिणाम होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
श्रीवर्धनमध्ये लोकांची तारांबळ
श्रीवर्धन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी अचानक ५०० व १ हजारांच्या नोटा रद्द केल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंगळवारी सायंकाळी पैसे भरण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झाली होती.बुधवारी अचानक बँकांना सुटी दिल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. वीज बिल भरणा केंद्रात ग्राहकांनी गर्दी केली मात्र ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच वीज ग्राहकांची निराशा झाली. मंगळवारी सायंकाळी श्रीवर्धनमध्ये एका महिलेकडे ५०० रूपयांच्या दोन नोटा होत्या मात्र अचानक ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच सर्वांचीच तारांबळ उडाली, तर पुण्याहून दिवेआगरला फिरण्यासाठी आलेले पर्यटकांना या गोष्टीची कल्पना मिळताच आपले पैसे चालणार नाहीत या भीतीने महिला घाबरली व आपण घरी कसे जाणार या विवंचनेने तिला रडू कोसळले. आता चलनात सुरू असलेल्या ५०० व १ हजाराच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत, या नोटा बँकांमध्ये भरणा केल्यानंतर बँका १०० रूपयांच्या नोटा ग्राहकांना देणार आहेत, मात्र यामध्ये सर्वसामान्यांची फरफट झाली आहे.