मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या वाहनावर लाल दिव्याऐवजी अंबर दिवा लावण्याचे निर्देश काढत राज्य शासनाने महापौरपदाचा अवमूल्यन केल्याचा आरोप महापौर सुनील प्रभू यांनी केला आहे. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत वाहनाला पुन्हा लाल दिवा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे देशात वेगळे स्थान आहे. ‘अ’ दर्जाची पालिका असली तरी पालिकेचा अर्थसंकल्प व कारभार हा एखाद्या छोट्या राज्यापेक्षा मोठा आहे. त्यात राजशिष्टाचारानुसार राज्यमंत्र्यांनंतर महापौरांचे आणि त्यानंतर मुख्य सचिवांचे स्थान असते. तरीही महापौरांना लाल दिवा नाकारणार्या शासनाने मुख्य सचिवांना मात्र लाल दिवा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने मुंबईच्या महापौरांचे अवमूल्यन केले आहे. शासनाने लाल दिवा नाकारण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, यासाठी महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. शिवाय लवकरच मागणी मान्य केली नाही, तर कायदेशीर मार्गाने लाल दिवा मिळवू, असेही महापौरांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
लाल दिवा नाकारल्याने महापौर झाले नाराज
By admin | Updated: May 29, 2014 02:28 IST